आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वजण नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करत असताना दिल्लीत स्कूटीवरून जात असलेल्या 20 वर्षीय तरुणीला एका कारने धडक दिली. यामुळे मुलगी गाडीखाली अडकली आणि सुमारे 12 किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत गेली. यामुळे मुलीची पाठीचे व डोक्याचे हाड घासले. मांस बाहेर आले. दोन्ही पायांची हाडे मोडली. अत्यंत वेदनादायक पद्धतीने तिचा मृत्यू झाला. मृतदेह सापडला तेव्हा शरीरावर एकही कपडा नव्हता.
यानंतर, पोलिसांनी रविवारी एफआयआर नोंदवला, ज्यामध्ये रॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्यासारखी अतिशय सौम्य कलमे लावण्यात आली. वाढता दबाव पाहून पोलिसांनी सोमवारी दोषी मनुष्यवधाचे कलम यात जोडले. दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया की तरुणीला कारने फरफटणाऱ्यांना किती शिक्षा होईल?
दिल्ली पोलिसांनी आरोपींवर एकूण 4 कलमे लावली
मुलीला कारसह फरफटत नेणाऱ्यांविरोधात आयपीसीचे कलम 279, आयपीसी कलम 304 ए, आयपीसी कलम 304 आणि 120 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमधील पाचही आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी दीपक खन्ना कार चालवत होता. त्यांच्यापैकी मनोज मित्तल हा भाजपचा नेता असल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये क्रेडिट कार्ड कलेक्शन एजंट, ड्रायव्हर आणि रेशन दुकान मालकाचा समावेश आहे.
1. IPC चे कलम 279 म्हणजे रॅश ड्रायव्हिंग: 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास
सुप्रीम कोर्टाचे वकील आणि 'रेप लॉ अँड डेथ पेनल्टी'चे लेखक विराग गुप्ता यांनी सांगितले की, जर एखादी व्यक्ती बेपर्वाईने गाडी चालवते, म्हणजे निश्चित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवते किंवा कमी वेगातही बेजबाबदारपणे गाडी चालवत असेल तर मोटार वाहन कायदा तसेच IPC चे कलम 279 अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.
निष्काळजीपणामुळे अपघात झाला तरच गुन्हा दाखल होईल, असे नाही. अशी व्यक्ती बेदरकारपणे गाडी चालवत असल्याची माहिती कोणी पोलिसांना दिली, तर पोलीस त्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 279 नुसार गुन्हा दाखल करू शकतात.
म्हणजेच एखादी दुर्घटना घडलीच पाहिजे असे नाही. खबरदारीचा उपाय म्हणूनही नोंदवला जाऊ शकतो. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याला 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
2. IPC चे कलम 304A म्हणजेच निष्काळजीपणाने मृत्यू: 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास
जर एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि मृत्यू झाला, तर सामान्य परिस्थितीत, निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा IPC च्या कलम 304A नुसार नोंदवला जातो. यामध्ये दोषी आढळल्यास 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
3. IPC चे कलम 304 म्हणजेच अहेतूक हत्या: जन्मठेप
जाणीवपूर्वक केलेल्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या अपघातात, आरोपीविरोधात अहेतूक मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. अशा वेळी बघितले जाते की, चालकाला हे माहिती होते की त्याच्या कृत्याने अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू ओढवू शकतो.
तसेच, अपघातानंतर, चालकाने वाहन न थांबवल्यास आणि जखमी व्यक्तीला ओढून नेत राहिल्यास किंवा असे कोणतेही कृत्य केले ज्यामुळे पीडिताचा मृत्यू होईल, तर त्याच्यावर देखील अहेतूक हत्येचा गुन्हा दाखल केला जातो. अपघातानंतर पीडित व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळाल्यास अनेक प्रकरणांत प्राण वाचू शकतात.
दिल्लीच्या प्रकरणातही अपघातानंतर आरोपींनी कार अनेक किलोमीटरपर्यंत चालवली. यानंतर मुलीचा वेदनादायक मृत्यू झाला. जखमी मुलीचा मृतदेह अनेक किलोमीटरपर्यंत ओढून नेणे हा जघन्य गुन्हा असून, त्यामुळे या प्रकरणी अहेतूक मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4. IPC चे कलम 120B म्हणजेच गुन्हेगारी कट
एका व्यक्तीने गुन्हा केला आहे पण दुसऱ्याने त्याला मदत केली आहे. म्हणजेच तो गुन्हेगारी कटात सहभागी झाला आहे. जसे दिल्ली प्रकरणात 5 आरोपी आहेत. यापैकी चालक एकच होता, मात्र त्याच्या गुन्ह्यात अन्य 4 साथीदार होते. म्हणजे एक प्रकारे त्यांचाही या गुन्ह्यात सहभाग होता.
अशा परिस्थितीत कलम 120B अन्वये गुन्हा दाखल केला जातो, जेणेकरून पाचही आरोपींना समान शिक्षा मिळू शकेल. ज्या प्रकरणात दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असते त्या प्रकरणासोबत कलम 120B लावले जाते.
पोलिसांवर का प्रश्न उपस्थित केले जात आहेत
नववर्षाच्या मुहूर्तावर संपूर्ण दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था असताना या महिलेला कारसह अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले जात असताना तिच्याकडे आणि तिच्या ओरडण्याकडे पोलिसांनी लक्ष का दिले नाही, याचीही चौकशी व्हायला हवी, असे विराग सांगतात.
पीसीआर व्हॅनला अपघाताची माहिती देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दीपकने केला आहे. दीपक नावाच्या या व्यक्तीचा दावा आहे की, 1 जानेवारी रोजी पहाटे 3.15 वाजता तो दूध डिलिव्हरीची वाट पाहत होता, तेव्हा त्याने कारखाली मुलगी फरफटत असताना पाहिले.
दीपकने बेगमपूरपर्यंत बलेनो कारचा पाठलाग केला. दरम्यान, दीपकने पोलिसांना फोन केला, मात्र पोलिसांनी पहाटे पाचपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. पीसीआर व्हॅनमधील पोलिस शुद्धीत नसल्याने त्यांनी कारवाई करण्यात रस घेतला नाही.
हा एक जीवघेणा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र कुटुंबीय याला खून म्हणत आहेत. पीडितेच्या आईचे म्हणणे आहे की, तिने खूप कपडे घातले होते, पण जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा ती पूर्णपणे नग्न होती. एकही कपडा नव्हता. हा कसला अपघात आहे?
कुटुंबीय म्हणाले- हे बलात्कारानंतर खूनाचे प्रकरण आहे. तिचे कपडे असेच फाटू शकत नाही. ती सापडली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. आम्हाला या प्रकरणाची सखोल चौकशी हवी आहे. मृत मुलीचे मामा प्रेम सिंह म्हणाले की, हे प्रकरण निर्भयासारखे आहे. आम्हाला न्याय हवा आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
पोलिसांनी आतापर्यंत कोणते पुरावे गोळा केले?
दिल्लीचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी सोमवारी या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, मुलीला कारसह 10 ते 12 किमीपर्यंत फरफटत नेले गेले. वळण आल्याने मुलीचा मृतदेह गाडीपासून वेगळा झाला. आरोपी दारूच्या नशेत होते की नाही हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणखी कलम जोडले जातील. आरोपींना 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे यांची टाइमलाइन तयार केली जाईल. त्याआधारे आरोपी कुठून आले होते, कुठे जात होते, याचा शोध घेता येईल. पोलिस क्राईम सीन रिक्रिएट करतली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. लवकरच तपास पूर्ण करू. आरोपींना कठोर शिक्षा देऊ असे ते म्हणाले.
विराग म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्टसोबतच या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तत्काळ ताब्यात घेण्याची गरज आहे. हा पुरावा खटल्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
हे वृत्तही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.