आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषभारताच्या प्रवेशद्वाराला तडे:मुंबईचे ताजमहल संकटात, पुरातत्व विभागाच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर

अनिकेत दिलवाले10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई शहराची शान असलेले 'गेट वे ऑफ इंडिया' सध्या चर्चेत आहे. गेट वे ऑफ इंडिया म्हणजे मुंबईच्या पर्यटनाचा क्षेत्राचा मानबिंदू होय. उन्हाळा असो वा पावसाळा पर्यटकांचे प्रेम मात्र गेट वे ऑफ इंडियासाठी कमी होत नाही. 100 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या गेट वे ऑफ इंडियाला मुंबईचे ताजमहल म्हणून ओळखले जाते. वर्षानुवर्षे अजस्त्र लाटा व कित्तेक वादळे झेलणाऱ्या गेट वे ऑफ इंडिया विषयी गेल्या काही दिवसात चिंता वाढवणाऱ्या बातम्या समोर आल्या आहेत.

गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेल्याच्या अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत. गेट वे ऑफ इंडियाला गेलेल्या तड्यांमुळे ही वास्तू कमकुवत होत असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक वास्तूला केवळ तडेच नाही तर काही ठिकाणी वनस्पतींची वाढ सुद्धा झाली आहे. राज्य पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्र सरकारला गेट वे ऑफ इंडियाच्या संवर्धनाचा प्रस्ताव मांडला आहे. ही वास्तू देशातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचा विषय ठरते. अशा या वास्तूला तडे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या दृष्टीने गंभीर बाब समजली जात आहे.

वैभवशाली इतिहास

गेट वे ऑफ इंडिया गेली 100 वर्षे मुंबईच्या किनाऱ्यावर राज्य पर्यटनाचा मान उंचावत आहे. त्यात ही बाब पर्यटन क्षेत्रासाठी चिंतेची ठरू शकते. विशेष म्हणजे ही वास्तू काही पर्यटनाचे ठिकाण नसून फक्त स्वागताची कमान म्हणून त्याची निर्मिती करण्यात आली. 1911 साली मुंबच्या किनाऱ्यावर ही भव्य अशी वास्तू उभारण्यात आली. ब्रिटनचे किंग पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी क्वीन मेरी यांच्या भारतभेटीच्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडियाची कमान बांधण्यात आली. 1924 साली ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. यातील आणखी महत्वपूर्ण बाब म्हणजे इंग्रजांची शेवटची तुकडीही याच गेट वे ऑफ इंडियामधून भारतातून निघून गेली.

जॉर्ज विट्टे या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकार झालेली ऐतिहासिक वास्तू म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया. 1911 साली या वास्तूचा निर्मितीस सुरुवात झाली. 4 डिसेंबर 1924 साली ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ही मुंबईची ही भव्य वास्तू. या वैभवशाली अशा वस्तूच्या निर्मितीकरिता 11 वर्षांचा कालावधी लागला.

राज्य पुरातत्व विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या दर्शनी भागात तडे गेले आहेत. तसेच त्याठिकाणी वनस्पतींची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रातील अनेक वादळे व लाटांमुळे गेट वे ऑफ इंडियाजवळील भिंतींना यापूर्वीच तडे गेल्याचे समोर आले होते. अशा अनेक कारणांमुळे आता या ऐतिहासिक वास्तूलादेखील धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.

गेट वे ऑफ इंडियाचे स्ट्रक्चर

गेट वे ऑफ इंडियाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. हा प्रवेशद्वार पिवळ्या बेसाल्ट आणि काँक्रीटने बांधण्यात आला. जवळच्याच ठाणे जिल्ह्यातूनच खरोदी खाणीतून हा दगड काढण्यात आला होता. वास्तूचा आकार पूर्णपणे आयताकार बनवण्यात आला. या वास्तूचे स्ट्रक्चरल डिझाईन 26 मीटर उंच असून त्यास कमानीचे स्वरूप देण्यात आले आहे. या भव्य अशा वास्तूला मुंबईचा ताजमहल असे सुद्धा संबोधले जाते. गेट वे ऑफ इंडियाची वास्तुशैली इंडो-सारसेनिक शैलीत तयार करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या वास्तूमध्ये हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेतील कोरीव काम, घुमट इत्यादी शैलींचा वापर करण्यात आला. तसेच या गेटमध्ये स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्त्यादेखील बसवण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...