आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावर गाजलेल्या 'आभाळमाया' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते पराग बेडेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि मुलगी आहे. पराग यांनी मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
लेखक चंद्रशेखर गोखले यांनी पराग यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत लिहिले, "पराग गेला? उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वत:च्या काही खास लकबी होत्या. बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाइल होती. मी त्यावरुन छेडले की छान हसायचा... हास्य तर लाजवाब होते त्याचे... कुठे गेला कुठे गेला हा शोध अचानक थांबला."
पराग यांनी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. अनेक नाट्य स्पर्धा, कार्यशाळा या माध्यमातून ते युवा रंगकर्मींशी जोडलेले होते. त्यांनी 'यदा कदाचित', 'मी नथुराम गोडसे बोलतोय', 'लाली लीला', 'पोपटपंची', 'सारे प्रवासी घडीचे' या दमदार नाटकांमध्ये अभिनय केला. नाटकांसह त्यांनी 'आभाळमाया', 'कुंकू', 'चारचौघी', 'एक झुंझ वादळाशी', 'ओढ लावावी जिवा' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केले. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली. ठाणे शहराला सांस्कृतिक क्षेत्रात नाव लौकिक मिळवून देण्यात पराग बेडेकर यांचा मोलाचा वाटा होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.