आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. आज सीबीआय त्यांच्या वतीने एफआयआर नोंदवून या प्रकरणाची चौकशी सुरू करू शकते. सीबीआयचे पथक आज बिहार पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित तपशील घेऊ शकतात.
दुसरीकडे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूची चौकशीसुद्धा सीबीआयकडूनच करुन घेण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतच्या घरचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची त्यांच्या मुंबईस्थित ऑफिसमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली. याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलादेखील समन्स बजावण्यात आले आहे. शुक्रवारी तिची चौकशी होऊ शकते.
सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तपासाबाबत बिहार आणि मुंबई पोलिसांतील वादावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात चौकशीसाठी मुंबई पोलिस हे बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी केला होता. एसपी विनय तिवारी यांना बळजबरीने क्वॉरंटाइन केल्याचेही ते म्हणाले. यावर महाराष्ट्र सरकारला फटकारत न्यायमूर्ती रॉय म्हणाले, ‘एसपींना क्वॉरंटाइन करणे हे चांगले संकेत नाहीत. बिहारमध्ये दाखल झालेला खटला मुंबईत सुरू असलेल्या चौकशीचा भाग नाही का? एकाच प्रकरणाची दोन राज्यांच्या पोलिसांनी चौकशी करणे योग्य नाही.’
बिहार डीजीपींनी बीएमसीला लक्ष्य केले
दरम्यान, बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी एक ट्विट करुन बीएमसीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एसपींना क्वॉरंटाइन करणे चांगले संकेत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाना म्हटले आहेत. तरीदेखील बीएमसीने आमच्या अधिक-याची सुटका केलेली नाही. हे लोक सर्वोच्च न्यायालयाचीही पर्वा करत नाहीत. आता या काय म्हणावे??? खेदजनक.. अशा आशयाचे ट्विट पांडेय यांनी केले आहे.
वकील विनीत ढांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दिशा सॅलियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत दोन्ही खटले एकमेकांशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे. त्यासोबतच सॅलियनच्या मृत्यूच्या तपासणी अहवालाची नोंद ठेवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत त्यांनी सांगितले की, तिची केस फाइल गायब किंवा डिलीट करण्यात आली आहे.
ढांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा अहवाल मागण्याची विनंती केली आहे. जर योग्य दिशेने तपास जात नसेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, असे ते म्हणाले. मुंबईतील मलाड परिसरातील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 14 जून रोजी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे सर्व संशयास्पद असल्याचे याचिकेत म्हटले आहे. बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून दिशा सॅलियनच्या तपासाचे फोल्डर पुन्हा रिकव्हर करण्यासाठी त्यांना मदत देऊ केली होती, मात्र मुंबई पोलिसांनी त्यासाठी त्यांना परवानगी दिली नाही, याचा उल्लेखदेखील या याचिकेत आहे.
दरम्यान, मंगळवारी दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलिसांत तक्रार दिली. मुलगी दिशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. आपल्या तक्रारीत त्यांनी असेही म्हटले की, दिशा कोणत्याही पार्टीत सामील झाली नव्हती किंवा तिच्यावर बलात्कार झाला नाही.
दिशाच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे आणि काही अनैसर्गिक जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचे अंतिम शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे.
दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणात आता दिशाचे वडील समोर आले आहेत. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा हिचा मृत्यू सुशांतच्या मृत्यूसोबत जोडून पाहिला जात आहे आणि या कारणाने पोलfस आणि मीडिया सातत्याने दिशाच्या कुटुंबीयांशी संपर्क करीत होते. दिशाच्या वडिलांनी पोलिसांत याबाबत तक्रार केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार मीडियातील लोक ज्याप्रमाणे त्यांना त्रास देत आहे आणि त्यांच्या मुलीबाबत खोटी बातमी पसरवत आहेत, यामुळे सुशांतच्या केसवर परिणाम होईल. शिवाय सॅलियन यांच्या कुटुंबीयांनाही याचा त्रास होत असल्याचे दिशाच्या वडिलांनी सांगितले.
दरम्यान नारायण राणेंनी दिशा सॅलियनच्या मृत्यूबाबतही गंभीर आरोप केले. 'दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिचा शवविच्छेदन अहवाल माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिचीसुद्धा हत्या करण्यात आली आहे. दिशावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे', असा आरोप राणेंनी केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.