आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हिने 'तांडव' वेब सीरिजवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तांडवचे निर्माते अली अब्बास जफर यांना उपदेशाचे डोस दिले. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर निशाणा साधताना तिने शिरच्छेदाची भाषा वापरली होती. मात्र नंतर तिने आपली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केली आणि त्यावर स्पष्टीकरणदेखील दिले.
या पोस्टवर स्पष्टीकरण देताना आता कंगना म्हणाली, "जे लोक लिब्रूच्या भीतीमुळे आईच्या कुशीत डोक ठेऊन रडत आहे, त्यांना मी सांगू इच्छिते की, मी त्यांच्या शिरच्छेदाविषयी बोलले नाही. इतके तर मलादेखील माहित आहे की, किडे किंवा अळ्यांसाठी कीटकनाशचं हवी असतात."
डिलीट केलेल्या पोस्टमध्ये काय म्हणाली होती कंगना
कंगनाने जी पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केली, त्यात ती म्हणाली होती, "भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाच्या 99 चुकांना क्षमा केली होती. पहिली शांती मग क्रांती... आता वेळ आली आहे शिरच्छेदाची, जय श्री कृष्ण," असे ती म्हणाली होती.
अली अब्बास जफर यांना विचारला होता संतप्त सवाल
कंगनाने यापूर्वीही अली अब्बास जफर यांच्या माफीनाम्यावर त्यांना संतप्त सवाल केला होता. तिने लिहिले होते, 'माफी मागण्यासाठी तो राहील तरी कसा? ते थेट गळाच चिरतात. जिहादी देश फतवे काढतात. लिब्ररल मीडिया व्हर्च्युअल लाँचिंग करते, तुम्हाला फक्त जीवे मारले जात नाही तर ते करणे किती योग्य होते हेही सिद्ध केले जाते. सांग अली अब्बास जफर अल्लाहची थट्टा करण्याची हिंमत तुझ्यात आहे का?', या आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली होती.
काय आहे प्रकरण?
‘तांडव’ वेब सीरिजच्या पहिल्याच भागातील एका दृश्यामध्ये अभिनेता झिशान अयूब नाटकात काम करत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात होता. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले. मुंबईत या वेब सीरिज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर लखनौत अॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अली यांनी माफीनाम्यात काय म्हटले?
वेब सीरिजवर होत असलेल्या चौफेर टीकेनंतर अली यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. त्यांनी लिहिले, 'ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जीवित व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत,' असे जफर यांनी म्हटले आहे.
'तांडव' ही वेब सीरिज नऊ भागांची आहे. यात सैफ अली खानसह डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, डीनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, गौहर खान, अमायरा दस्तूर आणि झिशान अयूब यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.