आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांसोबत ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या वेब सीरिजमध्ये झळकलेल्या दिव्यांदू शर्माने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप उमटवून हटके भूमिका साकारणारा हा अभिनेता कार्निवल मोशन पिक्चर्सच्या आगामी ‘मेरे देश की धरती’ या हिंदी चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मॉर्डन लुक व हातात कुदळ असलेला या चित्रपटातील त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला 'मेरे देश की धरती' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, ह्याची हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती... देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपला चित्रपट प्रासंगिक असल्याचे अभिनेता दिव्यांदू शर्मा सांगतो.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना दिव्यांदू सांगतो की, ‘मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेऊ शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास दिव्यांदू शर्मा व्यक्त करतो.
दिव्यांदू पुढे म्हणतो, 'हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाबद्दल खूप प्रोटेक्टिव आहे. माझी खरोखर अशी इच्छा आहे की हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, विशेषत: शेतक-यांपर्यंत, आम्ही चित्रपटात जे काही केले त्यामुळे कदाचित शेतक-यांच्या समस्या सुटणार नाहीत, परंतु यामुळे त्यांना मदत कशी मिळू शकते याची प्रेरणा मिळेल.'
दिव्यांदू शर्मा सोबत या चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्यासुद्धा भूमिका आहेत.
‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे. भोपाळमधील सेहोर जिल्ह्यासह मुंबई आणि आसपासच्या भागात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.