आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि तिची थोरली बहीण व मॅनेजर रंगोली चंदेल यांना मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. राजद्रोह आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात 25 जानेवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करु नका, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच, कंगनाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची गरज नाही, असेही आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. या आधी 8 जानेवारी रोजी कंगनाचा जबाब नोंदवण्यात आला होता.
कंगनाविरोधात वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295A आणि 153A या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. या खटल्याची सुनावणी 11 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली.
दोन तास झाली होती कंगनाची चौकशी
कंगना आणि रंगोली चंदेल 8 जानेवारी रोजी मुंबईतील वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्या होत्या. यावेळी दोन तास त्यांची चौकशी झाली होती. या दोघींविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार 17 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंगनाला चौकशीसाठी तीनदा समन्स बजावण्यात आले होते, पण भावाच्या लग्नाचे कारण देत ती चौकशीसाठी अनुपस्थित राहिली होती. यापूर्वी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनोट आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना 8 जानेवारी रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. कंगनाच्या 100हून अधिक ट्विट्सवर पोलिसांचे लक्ष आहे. पोलिसांना या सर्व ट्विट्सची चौकशी करायची आहे. 8 जानेवारीला पोलिसांनी फक्त 4-5 ट्विटची चौकशी केली होती.
कंगनावर याचिकाकर्त्याचे हे होते आरोप
कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सैय्यद यांनी प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कंगना रनोेटने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडवर टीका करताना या ठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.
कंगना वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल बोलत असते, असा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
कंगनाने बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारात एक विशिष्ट अंतर निर्माण केले आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्विट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात, असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.