आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1970 ते 90 च्या दशकातील बहुतेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तुम्ही एकाच अभिनेत्याला पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पाहिले असेल, त्याचे नाव होते इफ्तिखार. 1944 च्या सुमारास, त्यांनी गायक होण्यासाठी घर सोडले, परंतु ते अभिनेता बनले. इफ्तिखार पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत इतके प्रसिद्ध झाले की, खासगी आयु्ष्यातही लोक त्यांना पोलिस लोक त्यांना पोलिस अधिकारीही मानायचे. त्यांना पाहताच हवालदार ट्रॅफिक सिग्नलवर त्यांना सॅल्युट करायचे.
इफ्तिखार हे एक अप्रतिम चित्रकारही होते. त्यांनी अशोक कुमार यांना चित्रकला शिकवली होती आणि ते इफ्तिखार यांना आपले गुरू मानत होते. देशाची फाळणी होत असताना त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात जाऊन स्थायिक झाले. पण ते एकटेच भारतातच राहिले. कोलकात्यातील दंगलीतून जीव वाचवून ते आपल्या पत्नी आणि मुलींसह मुंबईत आले. काही चित्रपटांमध्ये त्यांनी नायकाची भूमिका साकारली आणि नंतर ते सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले.
बी.आर चोप्रांच्या 'इत्तेफाक' या चित्रपटात त्यांनी पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका इतकी चोख बजावली की, त्यांना तशाच भूमिका मिळू लागल्या. त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी बहुतेक चित्रपटात ते पोलिस अधिकारी, वकील, डॉक्टर किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसले. इफ्तिखार यांचे आपल्या मुलींवर खूप प्रेम होते. त्यांची मुलगी सईदा हिला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यावर त्यांना मोठा धक्का बसला होता. मुलीच्या निधनानंतर 21 दिवसांतच त्यांनीही या जगाचा कायमचा निरोप घेतला.
इफ्तिखार यांचा बॉलिवूड चित्रपटांवर खोलवर प्रभाव पडला. आजही कोणत्याही फिल्मी पोलिस इन्स्पेक्टरचा उल्लेख केला की, इफ्तिखार यांचा चेहरा सर्वात आधी डोळ्यासमोर येतो. आजच्या न ऐकलेल्या किश्शांमध्ये वाचा इफ्तिखार यांचा जीवनप्रवास...
केएल सेहगलसारखा प्रसिद्ध गायक होण्याचे बालपणीचे स्वप्न होते
इफ्तिखार यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1924 रोजी जालंधरमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव सय्यदना इफ्तिखार अहमद शरीफ होते. चार भावंडांमध्ये ते सर्वात मोठे होते. त्यांचे वडील कानपूरमधील एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. अभिनेता होण्याचा विचारही त्यांनी केला नव्हता. कुंदन लाल सहगल यांच्यासारखा प्रसिद्ध गायक बनण्याचे त्यांचे लहानपणापासूनच स्वप्न होते. ते सहगल साहेबांच्या शैलीतही गायचे, त्यामुळे आजूबाजूचे लोक त्यांना ओळखू लागले.
इफ्तेखार यांना चित्रकलेची आवड होती. हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी मॅट्रिक झाल्यानंतर लखनौ कॉलेज ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचा डिप्लोमा कोर्स केला. यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष संगीताकडे वळवले.
गायनात हात आजमावायला गेले, मिळाली चित्रपटाची ऑफर
हा किस्सा 1944 चा आहे. याकाळात चित्रपट उद्योगाचा एक मोठा भाग कोलकाता येथे राहत होता. एके दिवशी इफ्तिखार यांनी वडिलांना सांगितले की, त्यांना कोलकात्याला जाऊन गायक व्हायचे आहे. त्यांना गायनाची खूप आवड होती. म्हणून वडिलांनी 20 वर्षांच्या इफ्तिखारला कोलकात्याला पाठवले. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी एचएमव्ही म्युझिक कंपनीच्या कार्यालयात जाऊन ऑडिशन दिले. तेथे उपस्थित संगीतकार कमल दासगुप्ता यांना त्यांचे व्यक्तिमत्त्व तसेच त्यांचे गायन आवडले. ते म्हणाले की, तुम्ही गायक नाही तर अभिनेता व्हा. चित्रपटाची ऑफरही दिली. इफ्तिखार यांनी तो चित्रपट साइन केला. मात्र, त्या चित्रपटाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
स्वतःचा संगीत अल्बम रिलीज केला
या चित्रपटात ते अभिनेता म्हणून झळकले, पण त्यांची गाण्याची आवड कमी झाली नाही. गायनाला मोठे व्यासपीठ न मिळाल्याने इफ्तिखार यांनी स्वतःच्या गाण्यांचा अल्बम रिलीज करायचे ठरवले होते. अल्बमही प्रसिद्ध झाला. या अल्बममधील दोन गाणी लोकांना खूप आवडली होती. त्यानंतर ते कानपूरला गेले. ते कानपूरला पोहोचताच एका निर्मात्याने त्यांना टेलिग्राम पाठवून परत बोलावले होते. यावेळीही त्यांच्या वडिलांनी त्यांना कोलकात्याला पाठवले, पण इफ्तेखार तो पुन्हा कोलकात्याला अभिनेता होण्यासाठी जात असल्याचे समजल्यावर त्यांचे इतर नातेवाईक नाराज झाले होते.
ज्यू मुलीवर प्रेम आणि लग्न केले
कोलकातामध्ये इफ्तिखार यांचे लग्न सईदा नावाच्या मुलीसोबत निश्चित झाले होते. काही काळानंतर इफ्तेखार यांना हाना जोसेफ ही ज्यू मुलगी आवडू लागली, ती कोलकात्यात त्यांच्याच इमारतीत राहणारी होती. काही काळानंतर दोघांची मैत्री झाली. काही काळानंतर हाना देखील त्यांना पसंत करू लागली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
इफ्तिखार यांचे लग्न आधीच ठरलेले होते, पण त्यांना हानासोबत लग्न करुन संसार करायचा होता. यामुळे त्यांनी सईदासोबतचे नाते तोडून हानाशी लग्न केले. त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला या नात्याला विरोध केला होता, पण नंतर त्यांनी या नात्याला होकार दिला. लग्नानंतर हानाने तिचे नाव बदलून रेहाना अहमद ठेवले. 1946 मध्ये त्यांची मोठी मुलगी सलमाचा जन्म झाला आणि 1947 मध्ये त्यांच्या पत्नीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला, तिचे नाव सईदा होते.
कोलकात्यात परत आल्यानंतर, इफ्तिखार यांचा 'तकरार' हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये तो त्या काळातील आघाडीची अभिनेत्री जमुना सोबत दिसले होते. यानंतर त्यांचे 1945 मध्ये त्यांचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले.
फाळणीनंतर हे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले
इफ्तिखार यांची कारकिर्द सुरळीत चालू असताना भारत-पाकिस्तान फाळणी झाली. या फाळणीचा फटका त्यांनाही सहन करावा लागला. नातेवाइकांसह त्यांचे कुटुंबीयही भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक झाले, परंतु इफ्तिखार यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर ते ज्या फिल्म कंपनीत काम करत होते तेथून त्यांना काढून टाकण्यात आले.
कोलकात्यात दंगल झाली तेव्हा जीव वाचवण्यासाठी मुंबईत आले
कोलकात्यातील दंगल इतकी भयंकर होती की, त्यांनी आपल्या कुटुंबासह मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. ते मुंबईत संगीतकार अनिल बिस्वास यांना ओळखत होते, त्यानंतर इफ्तिखार यांची त्यांच्या मित्रांशी मैत्री झाली. इथे त्यांना कामाच्या शोधात वर्षानुवर्षे भटकावे लागले.
मुंबईच्या संघर्षाची आठवण करून देताना इफ्तिखार यांची मोठी मुलगी सलमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी आणि माझी बहीण दोघेही खूप लहान होतो आणि अनेकदा घरात खायला काही नसायचे. घराच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आईला मिस्टर पाटणवाला नावाच्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करावे लागले. दुसरीकडे जी काही छोटी कामे मिळत, ते बाबा करत असत. पण आमच्या आर्थिक स्थितीत काहीही बदल झाला नाही.'
इफ्तिखार हे अशोक कुमार यांचे गुरू होते
मुंबईत आल्यानंतर त्यांची भेट अशोक कुमार यांच्याशी झाली. नंतर अशोक कुमार यांच्यामुळे इफ्तिखार यांना चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या. इफ्तिखार हे उत्तम चित्रकारही होते. अशोक कुमार यांनीही त्यांच्याकडून चित्रकला शिकली. वयाने मोठे असूनही त्यांनी इफ्तेखार यांना आपला गुरू मानले.
इफ्तिखार हे अशोक कुमार यांचे गुरू कसे बनले याची कथाही रंजक आहे. एकदा अशोक कुमार खूप आजारी पडले होते, त्यामुळे ते बरेच दिवस बेडवर होते. काही काम करता येत नसल्याने त्यांची चिडचिड खूप वाढली होती. दरम्यान, इफ्तिखार त्यांना भेटण्यासाठी घरी गेले होते. अशोक कुमार यांची अशी अवस्था पाहून ते म्हणाले - तुम्ही ते काम करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. अशोक कुमार म्हणाले- मला चित्रकलेची आवड आहे, पण मला चित्रकला येत नाही. यानंतर इफ्तिखार यांनी त्यांना चित्रकला शिकवली.
पोलिसांच्या भूमिकेने इफ्तिखार यांचे नशीबच बदलले
आता त्या चित्रपटाचा किस्सा ज्यानंतर इफ्तिखार यांना चित्रपटांचा पोलिस अधिकारी म्हटले जाऊ लागले. चित्रपटाचे नाव होते 'इत्तेफाक'. यामध्ये इफ्तिखार यांनी पहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने त्यांचे नशीब बदलले. त्यानंतर इफ्तिखार यांच्याकडे कामाची रिघ लागली. लवकरच त्यांनी मुंबईतील खार येथे स्वतःचा फ्लॅट विकत घेतला. यानंतर जॉनी मेरा नाम, दीवार, डॉन यांसारख्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात त्यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली.
इफ्तिखारची मुलगी सलमा हिने सांगितले होते की, इत्तेफाक चित्रपटानंतर वडिलांचे करिअर पुन्हा रुळावर आले. यासाठी मी अशोक कुमार काकांना श्रेय देऊ इच्छिते. त्यांच्या शिफारशीवरून माझ्या वडिलांनी “BR फिल्म्स”मध्ये प्रवेश मिळाला होता.
खरा पोलिस अधिकारी समजून ट्रॅफिक पोलिस सॅल्युट करायचे
पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून इफ्तिखार इतके प्रसिद्ध झाले होते की, खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना पोलिस अधिकारीच समजत असत. एक किस्सा असा आहे की, ते ट्रॅफिक सिग्नलवरून जात होते, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला सॅल्यूट केले. प्रथम त्यांना याचे आश्चर्य वाटले, पण नंतर ते शांतपणे तिथून निघून गेले. अशी घटना त्यांच्यासोबत अनेकदा घडली होती.
अनेकवेळा त्यांनी ट्रॅफिक सिग्नल तोडला पण त्यांना पोलिस समजून त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही.
एकदा इफ्तेखार पत्नी हानासोबत बाहेर जात होते. ते नो एंट्री लेनमधून जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. पोलिस कर्मचाऱ्यांनी इफ्तिखार यांना कारमध्ये पाहताच त्यांना सॅल्यूट केला आणि कोणताही दंड न आकारता त्यांना सोडून दिले.
मोठ्या मुलीचे लग्न झाले आणि 15 वर्षांनी घटस्फोट झाला
1964 मध्ये इफ्तिखार यांची मोठी मुलगी सलमा हिचा विवाह डेहराडूनच्या श्रीमंत कुटुंबातील विपिन चंद्र जैन यांच्याशी झाला. अभिनेता होण्यासाठी विपिन चंद्र मुंबईत आले होते, तिथे त्यांची भेट सलमाशी झाली. प्रथम त्यांची मैत्री झाली, नंतर ते प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न केले.
लग्नानंतर सलमा आपल्या पतीसोबत डेहराडूनला राहायला गेली आणि तिथे तिने एका कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. यादरम्यान तिने एका मुलीला आणि एका मुलालाही जन्म दिला. लग्नाच्या 15 वर्षानंतर तिचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर ती मुंबईत परतली. येथे तिने 20 वर्षे सचिव म्हणून काम केले. सिप्पी यांचे ऑफिसही सांभाळले.
राजेश खन्नासोबतही जोडी जमली
इफ्तिखार यांनी राजेश खन्ना यांच्यासोबतही खूप काम केले. 'जोरू का गुलाम', 'द ट्रेन', 'खामोशी', 'मेहबूब की मेहंदी', 'राजपूत' आणि 'आवाम' यांसारख्या चित्रपटांमध्ये इफ्तिखार यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले होते.
इफ्तिखार यांनी वडील आणि आजोबांची भूमिकाही केली होती
पोलिस अधिकाऱ्याशिवाय इफ्तिखार यांनी इतरही उत्कृष्ट भूमिका केल्या. त्यांनी वडील, काका, पणजोबा, आजोबा, कोर्टरूम जज आणि डॉक्टरची भूमिका साकारली. या सर्वच भूमिकांमध्ये त्यांना पसंतीची पावती मिळाली होती.
जमीनदाराने वहिदा रहमान यांचे बोट चिरले, त्यामुळे इफ्तिखार यांना मिळाली होती भूमिका 'तिसरी कसम' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा हा किस्सा आहे. या चित्रपटात आधी खऱ्या जमीनदाराने भूमिका साकारली होती. यामुळे चित्रपटाला रिअल टच येईल, असा विश्वास दिग्दर्शकाला होता. खऱ्या जमीनदाराला अभिनयाची जाण नव्हती, पण सीननुसार त्याला प्रशिक्षण देण्यात आले. एका दृश्याच हिराबाईच्या भूमिकेत दिसणार्या वहिदा रेहमानने जमीनदाराला स्वतःच्या हाताने पान भरवावे असा सीन होता. सीन संपल्यानंतर दिग्दर्शकाने कट म्हटल्याबरोबर घरमालकाने वहिदाच्या बोटाला चावा घेतला. जमीनदाराला कट म्हणजे चावा घ्या असे वाटले होते. यानंतर बराच गदारोळ झाला होता.
यानंतर खऱ्या जमीनदाराला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. आणि त्याच्याजागी इफ्तिखार यांना त्या भूमिकेत कास्ट करण्यात आले होते.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त इफ्तिखार यांनी 1967 मध्ये अमेरिकन टीव्ही सिरीज 'माया'मध्ये काम केले होते. याशिवाय त्यांनी 1970 मध्ये 'बॉम्बे टॉकीज' आणि 1992 मध्ये 'सिटी ऑफ जॉय' सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले.
मुलीला कॅन्सर झाला तर उशीत तोंड लपवून रडायचे
इफ्तेखार यांचे त्यांची धाकटी मुलगी सईदा हिच्यावर सर्वात जास्त प्रेम होते. एके दिवशी सईदा खूप आजारी पडली, त्यानंतर तिला कॅन्सर झाल्याचे समजले. यानंतर इफ्तिखार यांनी 5 वर्षे तिची काळजी घेतली. या काळात तणाव आणि नैराश्याने त्यांना ग्रासले होते. आपल्या मुलीची अशी वाईट अवस्था पाहून ते रोज रात्री उशीत तोंड लपवून रडायचे.
सईदाचे 7 फेब्रुवारी 1995 रोजी कर्करोगाने निधन झाले. मुलीच्या मृत्यूने इफ्तिखार खूप खचून गेले. आपल्या मुलीला आपल्या समोर मरताना पाहणे त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायक होते आणि त्यांना हा धक्का सहन झाला नाही.
मुलीच्या मृत्यूनंतर 21 दिवसांनी इफ्तिखार यांचे निधन
त्यांच्या मुलीच्या निधनानंतर ते खूप आजारी पडले. त्यांनी लोकांना भेटणे बंद केले. खाण्यापिण्याचे भान राहिले नव्हते. रात्रंदिवस ते फक्त सईदाच्या आठवणीतच जगत होते. परिणामी, इफ्तेखार यांचे 1 मार्च रोजी वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर महिन्याभरातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
त्यांचा मृत्यू 1 मार्चला नव्हे तर 4 मार्चला झाल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता. मात्र इफ्तेखार यांच्या नातेवाईकांनी हे दावे फेटाळून लावले. 1 मार्च 1995 रोजी त्यांचे निधन झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.