आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रावण'चे फॅक्ट्स:'रामायण'मधील केवटच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला पोहोचले होते अरविंद त्रिवेदी, 300 जणांमधून झाली होती 'रावण'च्या पात्रासाठी निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशात झाला अरविंद त्रिवेदींचा जन्म

दूरदर्शनवरील रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची पुन्हा एकदा अफवा पसरली आहे. 82 वर्षीय अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी या वृत्ताचे खंडन केले असून काका अगदी ठिक आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील मे महिन्यातच अरविंद यांच्या निधनाची अफवा पसरली होती, त्यावेळी देखील कौस्तुभ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हे वृत्त नाकारले होते. खोटी बातमी पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले होते.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेला रावण आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 1986 मध्ये दूरदर्शनवर सुरू झालेल्या या मालिकेतील रावणच्या भूमिकेने अरविंद त्रिवेदी यांना लोकप्रियता मिळवून दिली होती.

या मालिकेतून अभिनेता अरुण गोविल यांना राम म्हणून प्रसिद्धी मिळाली, तर अभिनेता अरविंद त्रिवेदी यांनादेखील रावण म्हणून लोकप्रियता मिळाली. रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांच्याबद्दल लोकांना बरेच काही ठाऊक आहे, मात्र अरविंद त्रिवेदी यांच्याबद्दलची फारशी माहिती कधी समोर आली नाही. अरविंद त्रिवेदी हे गुजरातमधील साबरकांठाचे खासदारही राहिले आहेत.

मध्य प्रदेशात झाला अरविंद त्रिवेदींचा जन्म
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला होता, परंतु त्यांनी गुजरातला आपली कर्मभूमी बनवली. गुजराती थिएटरमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे गुजराती चित्रपटांमधील एक लोकप्रिय नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. लंकेश म्हणजेच अरविंद त्रिवेदी यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले आहे. गुजराती भाषेच्या धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांमुळे त्यांना गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली.

300 जणांनी दिली होती रावणच्या पात्रासाठी ऑडिशन
अरविंद त्रिवेदी यांनी एकदा सांगितले होते की, त्यांनी रामायणातील केवटच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. रामानंद सागर यांनी त्यांची ऑडिशन घेतली होती. ऑडिशन घेताना त्यांना समजले की, रावणच्या भूमिकेसाठी अरविंद अधिक परफेक्ट आहेत. रामानंद सागर अरविंद यांच्या बॉडी लँग्वेजने खूप प्रभावित झाले होते आणि म्हणून त्यांनी रावणाच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली होती. त्याआधी रामानंद सागर यांनी रावणाच्या भूमिकेसाठी तब्बल 300 जणांची ऑडिशन घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...