आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराRRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला आज ऑस्कर मिळाला आहे. RRR हा दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा 12 वा चित्रपट आहे. राजामौली हे एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांचे सर्व चित्रपट हिट झाले आहेत. 2001 मध्ये स्टुडंटपासून ते RRR पर्यंत राजामौली यांनी आपल्या चित्रपटासाठी प्रत्येक वेळी नवीन विषय निवडला. केवळ चित्रपटच हिट झाले नाहीत तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीला या चित्रपटांमधून अनेक सुपरस्टारही मिळाले आहेत.
ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर, रामचरण तेजा, रवी तेजा आणि नितीन यांसारखे 4 सुपरस्टारदेखील दिले आहेत. राजामौली यांनी टेलिव्हिजन शो दिग्दर्शित करून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली, त्यानंतर आज त्यांनी मगधीरा, ईगा, बाहुबली: द बिगिनिंग, बाहुबली: द कन्क्लूजन यांसारखे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत.
चला जाणून घेऊया राजामौली यांचा टीव्ही ते भारतातील टॉप डायरेक्टर होण्याचा प्रवास कसा होता...
राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी 20 हून अधिक ब्लॉकबस्टर चित्रपट लिहिले
एसएस राजामौली यांचे वडील केव्ही विजयेंद्र प्रसाद हे भारतीय पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहेत, ज्यांनी अनेक हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेतील चित्रपटांची कथा लिहिली आहे. 1988 पासून विजयेंद्र प्रसाद यांनी 20 हून अधिक ब्लॉकबस्टर चित्रपट लिहिले आहेत, ज्यात बाहुबली सीरीज, बजरंगी भाईजान, मणिकर्णिका, थलाइवी, मगधीरा आणि आरआरआरचाही समावेश आहे.
टेलिव्हिजन शोजमधून ठेवले दिग्दर्शनात पाऊल
राजामौली यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांच्या टॅलेंटमुळे त्यांना तेलगू टीव्ही शो दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला राजामौली यांनी राघवेंद्र राव यांच्यासोबत शांती निवासन या तेलगू ड्रामा सिरीजचे दिग्दर्शन केले होते.
पहिल्या चित्रपटाने 2001 मध्ये कमावले होते 12 कोटी
राजामौली यांनी 2001 मध्ये तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट स्टुडंट नंबर 1 होता, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर मुख्य नायक होता. 1.80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 12.09 कोटींची कमाई केली. या चित्रपटाची निर्मिती राघवेंद्र राव यांनी केली होती. राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट ज्युनियर एनटीआरचा पहिला सुपरहिट चित्रपट होता. दोन वर्षांनंतर, राजामौली आणि जूनियर एनटीआर यांनी सिंहाद्री (2003) साठी हातमिळवणी केली. हा चित्रपटही खूप गाजला.
दोन वर्षांच्या अंतरात, राजामौली यांनी त्यांचा आवडता नायक मल्याळम स्टार मोहनलाल यांच्यासोबत त्यांच्या पहिल्या पौराणिक चित्रपटाची तयारी सुरू केली, तथापि, काही कारणांमुळे हा चित्रपट कधीही बनू शकला नाही.
दिग्दर्शकाचा तिसरा चित्रपट साई (2004) होता, ज्यात नितीन आणि जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत होते. टॉलिवूडच्या इतिहासात रग्बीवर चित्रपट बनण्याची ही पहिलीच वेळ होती. 8 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट राजामौली यांच्या कारकीर्दीतील सर्वात महागडा चित्रपट होता, जो वर्षभर चित्रपटगृहांतून बाहेर पडला नाही. या चित्रपटाने 13 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाला 4 नंदी पुरस्कार मिळाले होते.
हजार दिवस चित्रपटगृहात चालला होता मगधीरा चित्रपट
2006 मध्ये आलेला विक्रमार्कुडू हा चित्रपट राजामौली यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. रवी तेजा अभिनीत हा चित्रपट कन्नड, तामिळ आणि हिंदी भाषेत (राउडी राठोड) रिमेक करण्यात आला होता.
2009 मध्ये आलेल्या मगधीरा या चित्रपटाने राजामौली यांना साऊथ इंडस्ट्रीव्यतिरिक्त देशभरात ओळख मिळवून दिली. काजल अग्रवाल, रामचरण स्टारर हा चित्रपट 35 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये तयार झाला होता, ज्याने 150 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. हा चित्रपट 1,000 दिवस थिएटरमध्ये चालला आणि चंद्रमुखी या चित्रपटाचा सर्वाधिक काळ चालणारा विक्रम मोडला. हा साऊथचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला, ज्याने दोन राष्ट्रीय पुरस्कार, 6 फिल्मफेअर आणि 9 नंदी पुरस्कार जिंकले. हा तोच चित्रपट आहे ज्यातून मुख्य कलाकार रामचरण आणि काजल अग्रवाल यांना स्टारडम मिळाले. मगधीराने साऊथ इंडस्ट्रीमध्ये पीरियड ड्रामा आणि सोशल-फँटसीचा ट्रेंड आणला.
यानंतर राजामौली यांनी मर्यादा रमन्ना (हिंदी रिमेक सन ऑफ सरदार), ईगा (मख्खी) दिग्दर्शित केले. मर्यादा रमन्नाने 60 कोटी आणि ईगाने 130 कोटींची कमाई केली.
बाहुबली -ज्याने 2015 मध्ये रचला इतिहास
एस. एस. राजामौली यांनी 2015 मध्ये भारतातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट दिला, तो म्हणजे बाहुबली. या चित्रपटाने राजामौली यांना जगभरात ओळख मिळवून दिली.
या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जगभरात 75 कोटींची कमाई केली आहे. जी भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग होती. नंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड 2016च्या कबालीने 82 कोटी कमवून मोडला. 300 कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला साऊथ चित्रपट होता, ज्यापैकी 263 कोटी फक्त एका दिवसाचे कलेक्शन होते. तेव्हापासून भारतात पॅन इंडिया चित्रपटांचा ट्रेंड सुरू झाला. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 650 कोटींची कमाई केली, तर त्याचा सिक्वेल बाहुबली: द कन्क्लूजन (2017) ने 1800 कोटींची कमाई करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
दाक्षिणात्य चित्रपटाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासात दंगलनंतरचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
चित्रपटांसाठी राजामौलींची खास युक्ती
राजामौली आपल्या प्रत्येक चित्रपटाला परिपूर्ण बनवण्यासाठी खास शस्त्रे वापरतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. राजामौलीच्या प्रत्येक चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या हातात नवनवीन प्रकारची शस्त्रे पाहायला मिळाली आहेत.
सिंहाद्री
सर्वप्रथम, सिंहाद्री चित्रपटातील मुख्य अभिनेता ज्युनियर एनटीआरसाठी राजामौली यांनी खास दुहेरी धार असलेली कुऱ्हाड तयार केली. या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर ही मालिका सुरू झाली.
छत्रपती
राजामौलींच्या ‘छत्रपती’मध्ये प्रभासच्या हातात कुऱ्हाडीसारखे नवे शस्त्र दिसले.
विक्रमार्कुडू
रवी तेजाने या चित्रपटात धारदार शस्त्रांचा वापर केला आहे. हे हत्यार बघायला इतके भीतिदायक होते की फायटिंग सीनमध्ये अंगावर रोमांच येणार हे स्पष्टच होते.
मगधीरा
या पीरियड ड्रामामध्ये अनेक उत्कृष्ट अॅक्शन सीन होते, ज्यामध्ये हजारो शस्त्रे वापरली गेली होती. ही सर्व शस्त्रे केवळ चित्रपटासाठी तयार करण्यात आली होती. रामचरण व्यतिरिक्त नकारात्मक भूमिकेत दिसणारे रणदेव भिल्लाचे शस्त्रही ठळकपणे समोर आले.
ईगा
साऊथच्या ईगा या चित्रपटात पहिल्यांदाच एका माशीला नायक म्हणून सादर करण्यात आले होते. चित्रपटात या पात्राने सुईला आपले शस्त्र बनवले.
बाहुबली
राजामौली यांनी 2015 मध्ये आलेल्या बाहुबली चित्रपटासाठी 20,000 शस्त्रे तयार केली होती. यामध्ये अॅक्शन सीनमध्ये नवीन युक्त्या आणि नवीन प्रकारची शस्त्रे पाहायला मिळाली. भल्लालदेवचा धारदार शस्त्रांचा रथ प्रेक्षकांसाठी अगदी नवीन होता. बाहुबली आणि कालकेय यांची शस्त्रेही अतिशय अनोखी होती. चित्रपटात पाहिलेल्या सर्व शस्त्रास्त्रांचे एक संग्रहालयही बांधण्यात आले आहे.
घटस्फोटित रमा यांना बनवले जोडीदार
राजामौली यांनी 2001 मध्ये रमा यांच्याशी लग्न केले. रमा या दिग्दर्शकापेक्षा वयाने मोठ्या होत्या आणि आधीच विवाहित होत्या. त्या एका मुलाच्या आई आहेत. रमा यांनी घटस्फोट घेतला तेव्हा राजामौली यांनी त्यांना खूप साथ दिली. हळूहळू दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि एके दिवशी राजामौली यांनी त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला. रमा यांना पहिल्या लग्नापासून मुलगा होता आणि लग्नानंतर राजामौली यांनी एक मुलगी दत्तक घेतली.
राजामौली यांच्या पत्नी आहेत चित्रपटांच्या कॉस्च्युम डिझायनर
एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजामौली त्यांच्या वेशभूषेच्या डिझाइनवर समाधानी नव्हते. जेव्हा रमा यांनी त्यांची अस्वस्थता पाहिली, तेव्हा त्यांनी स्वतः राजामौलींचे डिझाइन करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीदरम्यान रमा यांनी सांगितले की, त्यांना कधीच डिझायनर व्हायचे नव्हते, पण त्या राजामौली यांचे मन वाचू शकतात, म्हणून त्यांच्यासाठी डिझाइन करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.