आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज राहत्या घरी निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. फड सांभाळ तऱ्याला गं आला.., पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना यांसारख्या एकाहून एक ठसकेबाज लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजात स्वरबद्ध केल्या. जाणून घेऊया त्यांच्या जीवनप्रवासाविषयी...
मुंबईत झाला होता जन्म, चाळीत गेले बालपण
सुलोचना चव्हाण यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम असे होते. 13 मार्च 1933 रोजी मुंबईत एका सामान्य घरात त्यांचा जन्म झाला होता. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळी मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता, त्याचे नाव श्रीकृष्ण बाळमेळा असे होते. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत.
ग्रामोफोन ऐकून करायच्या रियाज
सुलोचना चव्हाण यांची थोरली बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली.
वयाच्या नवव्या वर्षी गायले होते पहिले गाणे
श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव 'कृष्ण सुदामा' हे होते. नऊ वर्षांच्या असताना सुलोचना चव्हाण यांनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले होते.. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो अशी आठवण त्यांनी सांगितली होती.
अनेक दिग्गजांसोबत गायन
यानंतर सुलोचना यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे सहगायक असायचे सी. रामचंद्र. पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करिअरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या "भोजपुरी रामायण" गायल्या होत्या.
बेगम अख्तर यांना बसला होता धक्का
सुलोचना चव्हाण यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण होती. सुलोचनाबाईंचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
आईचा खाल्ला होता ओरडा आणि नंतर अशी झाली लावणी गायनाला सुरुवात
वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली 'सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची' ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या "हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात गायली. या लावणीचे संगीतकार वसंत देसाई होते, तर ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रीत झाली होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. सुलोचना यांनी स्वरबद्ध केलेल्या पहिल्या लावणीचे बोल "मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी..." असे होते. आचार्य अत्रे यांनीच सुलोचना चव्हाण यांना "लावणीसम्राज्ञी" हा किताब दिला होता.
सुलोचना चव्हाण यांचे लग्न
सुलोचना चव्हाण यांनी 1953-45 च्या काळात "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शक एस. चव्हाण हे होते. पुढे त्यांच्याशीच सुलोचना यांचे लग्न झाले आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या.
सुलोचनाबाई म्हणायच्या, मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे
'रंगल्या रात्री अशा' या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावे असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खऱ्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. "पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे" असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.
मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. आज फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार त्यांची स्मृतीही कमी झाली होती. यावर काही उपचार नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच ठेवण्याचा सल्ला दिला होता. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.