आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला नुकतीच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. 24 फेब्रुवारी 1999 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले होते. या दोघांची जोडी बॉलिवूडमधील बेस्ट कपलपैकी एक आहे. दोघांचे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत कसे पोहोचले याचा रंजक किस्सा आहे. काजोलने एका मुलाखतीत अजयसोबतची तिची लव्ह स्टोरी शेअर केली होती. तिने सांगितल्यानुसार, दोघांचे प्रेम लव्ह अॅट फर्स्ट साइट मुळीच नव्हते.
अजयकडून सल्ला घ्यायची काजोल
एका मुलाखतीत काजोलने सांगितले होते की, अजयसोबत पहिली शॉट ('हलचल' सिनेमातील) देताना तिला जाणीव झाली होती, की ही व्यक्ती तिच्या आयुष्यात महत्वाची आहे. मात्र, त्यावेळी काजोल आणि अजय दोघे दुस-यांसोबत रिलेशनमध्ये होते. दोघे मित्रांप्रमाणे एकत्र वेळ घालवत होते. त्यादरम्यान काजोल अजयकडून तिच्या रिलेशनशिपसाठी सल्ला घ्यायची आणि अजयसुद्धा एखाद्या 'बाबाजी'प्रमाणे तिला टिप्स द्यायचा.
कसे जवळ आले काजोल-अजय
दोघांची भेट 'हलचल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. आधी मैत्री झाली. परंतु अजयला पहिल्यांदा भेटल्यानंतर काजोलच्या लक्षात आले, की अजयला समुद्र किना-यावर एकटे बसायला आवडते. तो फारसा कुणाशी बोलत नव्हता. मुळात अजयचा स्वभावच अबोल असा होता. त्यावेळी काजोलला वाटायचे की, एखाद्या व्यक्तीला कुणाशी बोलायला आवडत नाही, असे कसे होऊ शकते. कालांतराने अजय हळू-हळू काजोलसोबत बोलायला लागला आणि त्यांची मैत्री झाली.
त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' हे त्यांनी एकत्र केलेले चित्रपट आहेत. हळू-हळू अजय आणि काजोल यांच्यात जवळीक वाढली आणि अखेर 1999 मध्ये दोघांनी लग्न केले. हे लग्न अजय देवगणच्या घरी महाराष्ट्रीयन पध्दतीने झाले होते.
या कारणांमुळे काजोलने केले होते अजयसोबत लग्न
एका मुलाखतीत काजोलने खुलासा केला होता की, तिला खासगी आयुष्य आणि करिअर यांच्यात स्थिरता आणायची होती. करिअरच्या दगदगीतून शांत व्हायचे होते, म्हणून तिने लग्नाचा निर्णय घेतला होता .काजोल म्हणाली होती, "त्यावेळी मी केलेली ती योग्य गोष्ट होती. त्याअगोदर मी जवळपास आठ ते नऊ वर्षे काम करीत होते. त्यामुळे मला कामाच्या दगदगीतून थोडे शांत व्हायचे होते आणि हे लग्न केल्यामुळे शक्य होणार होते." ती पुढे म्हणाली होती, "मी वर्षाला 4 ते 5 चित्रपट करत होते. मला तसेच करत राहावे असे वाटत नव्हते. माझ्या स्वभावात ते बसणारे नव्हते. त्यामुळे लग्न करावे आणि वर्षातून एकच सिनेमा करावा असे मी ठरवले होते. आता मी आनंदी आहे आणि सर्व स्थिरसावर झाले आहे."
अजयसोबत लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर वडील एक आठवडा बोलले नव्हते
काजोलने मुलाखतीत सांगितले होते, "मी आणि अजयने लग्न करावे अशी कुणाचीही इच्छा नव्हती. माझे कुटूंब खुप कन्फ्यूज्ड होते. मी वडिलांना अजयसोबत लग्न करण्याविषयी सांगितले तेव्हा ते एक आठवडा माझ्यासोबत बोलले नव्हते.' काजोलने सांगितल्यानुसार, तिचे वडील तिला म्हणाले होते की, तिचे करिअर खुप चांगले सुरु आहे आणि लग्नासाठी तिचे वय खुप कमी आहे. पण काजोल तिच्या निर्णयावर ठाम होती. तिच्या या निर्णयात आई तनुजाला पाठिंबा तिला मिळाला होता. अशाप्रकारे अजयसोबत काजोलचे लग्न झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.