आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Center Fails To Control Corona, Recalls Medieval Catastrophe Caused By Second Wave Damage In India Ruchir Sharma; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र अपयशी, भारतात दुसऱ्या लाटेने झालेल्या नुकसानीमुळे मध्ययुगीन कालखंडातील हालअपेष्टांची आठवण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य यंत्रणा 7940 च्या मॉडेलवरच काम करतेय, राज्यांच्या अनेक संस्थाही जुन्या आराखड्यानुसारच काम करताहेत
  • अनेक देशांनी पहिल्या लाटेपासून धडा घेतला, दुसऱ्या लाटेत मृत्युदर नियंत्रित

गेल्या महिन्यात देशात महामारी उच्चांकावर होती, अशा काळातही सुमारे १५ कोटी लोकांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जास्तीत जास्त ठिकाणी सभा व्हाव्यात या हेतूने मतदान अनेक टप्प्यांत व्हावे, अशी सत्ताधारी भाजपची इच्छा होती. त्यामुळेच एकट्या पश्चिम बंगालमध्ये मोदींनी २४ वेळा दौरा केला. भाजपने बंगालसारख्या राज्याची सत्ता मिळवण्यासाठी जेवढा कठोर संघर्ष केला तेवढा क्वचितच एखाद्या पक्षाने केला असेल. पक्षाने आपली संपूर्ण राजकीय यंत्रणा, प्रचंड निधी आणि कार्यकर्त्यांची फौज राज्याच्या निवडणुकीत उतरवली होती. पण एवढे प्रयत्न करूनही बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेपासून दूर करण्यात भाजपला यश मिळाले नाही हे गेल्या रविवारी स्पष्ट झाले. निवडणुकीत नंतरच्या टप्प्यांत कोरोना देशात अनियंत्रित होत चालला होता आणि अशा स्थितीत भाजपची गती मंद झाली होती.

गेल्या सुमारे सहा आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. अधिकृत आकडेच रुग्णांत १२ पट वाढ झाल्याचे दाखवत आहेत, खरे आकडे तर त्यापेक्षा जास्त भयावह असतील. अशा प्रकारची आपत्ती चांगली आरोग्य यंत्रणा असलेल्या जगातील कुठल्याही देशाला संकटात टाकू शकते. या आपत्तीने भारतात आधीच विस्कळीत झालेली यंत्रणा जगासमोर आणली. तसे तर इटली आणि फ्रान्ससारख्या काही विकसित देशांतही कोरोनाच्या नव्या लाटेत रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली, पण त्यांनी पहिल्या लाटेपासून धडा घेत आपली आरोग्य यंत्रणा नव्या धोक्यासाठी सज्ज ठेवली होती. त्यामुळे हे देश पहिल्या लाटेच्या तुलनेत मृत्युदर कमी राखण्यात यशस्वी ठरले. त्याउलट भारतात दुसऱ्या लाटेने एवढे नुकसान झाले की त्यामुळे मध्ययुगीन कालखंडातील भयानक हालअपेष्टांची आठवण करून दिली.

क्षमतेपेक्षा जास्त भरलेली रुग्णालये प्रवेशद्वार बंद करत आहेत आणि उपचारासाठी भटकत असलेल्या रुग्णांना मरण्यासाठी सोडून देत आहेत अशी व्हिडिओ क्लिप मी जेव्हा पाहिली तेव्हा मी प्रचंड घाबरलो आणि मला माझ्या आजोबांबाबतचा प्रसंग आठवला. अशाच परिस्थितीत त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले होते. आम्ही त्यांना एका सरकारी रुग्णालयात घेऊन गेलो होतो. तेथे नाइट ड्युटीवर कोणीच डॉक्टर नव्हता. त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला, पण पेसमेकर लावण्यात यश मिळाले नाही. ही गोष्ट आहे १९९३ ची. पण त्यानंतरही खूप कमी प्रगती झाली आहे. जगातील विकसित होत असलेल्या २५ बाजारांत समाविष्ट असलेला भारत १००० रुग्णांसाठी रुग्णालयातील बेडच्या बाबतीत शेवटच्या स्थानी आहे. हीच स्थिती डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांबाबत आहे. श्रीमंत देश वगळून तुलना केली तरी भारतात दरडोई उत्पन्न १००० ते ५००० डॉलर आहे. ते जवळपास पाकिस्तान आणि बांगलादेशएवढेच आहे. भारत अजूनही पायाभूत आरोग्य सुविधांच्या बाबतीत साधारण स्तरावर आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:ला देशाचा रक्षक अशा स्वरूपात सादर केले. पण वस्तुस्थिती अशी आहे की, फॉर्म्युला १ चा चालक अॅम्बेसॅडरमध्ये (देशातील जुन्या कारपैकी एक) कमाल दाखवू शकत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, भाजप आता शासनाचे उत्तम मॉडेल देण्याचा दावा करू शकत नाही. ही उणीव निवडणुकांत दिसत आहे.

मोदींनी ‘मॅक्झिमम गव्हर्नन्स’चे आश्वासन दिले होते, पण सत्तेचे केंद्रीकरण केले
मोदींनी देशाच्या आधुनिकीकरणासाठी खूप काम केले आहे, पण देश अजूनही ब्रिटिश शासन काळाची आठवण देणाऱ्या कार्यपद्धतीवरच चालत आहे. राज्यांच्या अनेक संस्थांचे मॉडेल १८०० नंतरचे आहे आणि आरोग्य यंत्रणेचे मॉडेल १९४० च्या सुमाराचे आहे. गेल्या वेळी निवडणुकीत मी भारतात हजारो किमीचा प्रवास केला.त्या वेळी आरोग्य केंद्रांत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, शस्त्रक्रिया कक्षांत सर्जन नाहीत, एक्स-रे मशीनसाठी रेडिओलॉजिस्ट नाहीत, असे मला आढळले. पीएम मोदींनी ‘मॅक्झिमम गव्हर्नन्स’चे आश्वासन दिले होते.पण देशाच्या जुन्या मॉडेलवर काम करणाऱ्या राज्यांत सुधारणा करण्याऐवजी त्यांनी सत्तेचे केंद्रीकरण केले.

बातम्या आणखी आहेत...