आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तविली आहे. लाहोर हायकोर्टात याचिका दाखल करण्यासाठी गेले असता त्यांनी सांगितले की, मला मारण्यासाठी तिसऱ्यांदा कट रचला जात आहे. माझ्यावर सुरू असलेले सर्व राजकीय खटले रद्द करावेत अशी मागणी त्यांनी केली. जेणेकरून मला पुन्हा पुन्हा न्यायालयात ये-जा करण्याची गरज पडणार नाही.
वारंवार कोर्टात ये-जा करताना आपल्या जीवाला आणखी धोका निर्माण होऊ शकतो, असे इम्रान यांनी सांगितले. इम्रान खान यांच्यावर देशभरातील विविध शहरांमध्ये जवळपास 121 खटले सुरू आहेत. यामध्ये देशद्रोह, ईशनिंदा, हिंसा भडकावणे, दहशतवाद पसरवणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. इम्रान यांच्या म्हणण्यानुसार ही सर्व प्रकरणे राजकीय हेतूने प्रेरित असून ती फेटाळली जावीत.
वजिराबाद-इस्लामाबादेत मला जीवे मारण्याचा प्रयत्न
इम्रान खान मंगळवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत लाहोर उच्च न्यायालयात पोहोचले. येथे त्यांनी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांकडे बोलण्याची परवानगी मागितली. खान कोर्टात म्हणाले - पंजाबमधील वजीराबाद आणि इस्लामाबाद ज्युडिशियल कॉम्प्लेक्स (IJC) मध्ये माझ्यावर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. या दोन्ही हल्ल्यातून मी कसाबसा वाचलो, त्यामुळे हे लोक मला तिसऱ्यांदा मारण्याचा कट रचत आहेत. सतत कोर्टात येत असल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
इम्रान म्हणाले- माझ्यावरील सर्व खटले राजकीय हेतूने प्रेरित
माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, 70 वर्षांपासून माझ्यावर एकदाही गुन्हा दाखल झाला नाही, पण गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सत्तेतून बाहेर पडल्यानंतर माझ्यावर सतत या ना त्या कारणाने खटले दाखल केले जात आहेत. 'डॉन'च्या वृत्तानुसार, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने खान यांना सर्व प्रकरणांमध्ये पोलिस तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. इम्रान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासात सहभागी होण्याची परवानगी मागितली होती, जी न्यायालयाने फेटाळली. आता 8 मे रोजी इम्रान खान यांची पुन्हा सुनावणी होणार आहे.
'PM शाहबाज-ISI अधिकाऱ्यांना मला मारायचे'
यापूर्वी इमरान खान यांनी एका व्हिडिओ जारी करत त्यात म्हटले होते की, 6 लोक त्याच्या हत्येचा कट रचत आहेत. यापैकी 3 जणांवर माजी पंतप्रधानांनी वजिराबाद हल्ल्यानंतर 3 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि ISIचे सर्वोच्च अधिकारी मेजर जनरल फैसल नसीर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवला.
खान म्हणाले- गृहमंत्री म्हणतात की माझ्यावर विदेशी सैन्याने हल्ला केला. या देशात फक्त 3 लोकांना मला मारायचे आहे असे काही नाही. मी त्यापैकी 3 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. 18 मार्च रोजी IJC हल्ल्यानंतर मी व्हिडिओ जारी करून उर्वरित 3 लोकांची माहिती दिली होती. माझ्या जीवाला काही झाले तर त्याला सर्वस्वी हे तीन लोकच जबाबदार असल्याचे म्हटले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.