आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भावनिक होण्याचे प्रसंग नक्की येतात. भावुक होणे हे आपल्या माणूसपणाचे लक्षण आहे. तुमच्या आवडीचा संघ हरतो तेव्हा तुम्ही भावुक होता. अपयश पदरी पडते तेव्हा तुम्ही भावुक होता. जवळचा माणूस सोडून गेला की तुम्ही भावुक होता. माणूस म्हणून भावनिक होण्यापासून आपली सुटका नाही. खरं तर भावनिक नसाल तर मग तुम्हाला रोबोट म्हणावे लागेल.
तुम्ही कोणत्या कारणाने भावुक झालात हे इथे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे की, त्यानंतर काय घडते? मी भावनिक अवस्थेतून बाहेर पडलो तेव्हा मनाला सांगितले की, हे वळण माझ्यासाठी निर्णायक असेल. माझे अश्रू मी वाया जाऊ देणार नाही. इथे त्या भावनांविषयी सांगायचे नाही आहे. मुद्दा हा की, मी त्या अवस्थेतून बाहेर कसा पडलो. कोणते निर्णय घेतले, कोणते पर्याय निवडले, कोणते पाऊल उचलले? या गोष्टींमुळे मी आयुष्यात वेगाने पुढे आलो. मी २२ वर्षांचा होतो तेव्हा दुबईत एका सॉफ्टवेअर विभागाचा प्रमुख होतो. माझ्या विभागात एकूण २७ लोक होते आणि ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. मला हे सांगायचे नाही की, मी आयुष्यात महान असे काहीतरी केले आहे. मी त्यापेक्षाही मोठ्या गोष्टी साध्य केल्या. मला फक्त हेच सांगायचे आहे की, ९९ टक्के जग कुठल्या तरी भावनेने बांधलेले असते. उदास, खिन्न, चिंतित, दु:खी, हतोत्साहित, रडका.. फरक एवढाच होता की मी या भावनांमध्ये अडकलो नाही.
आयुष्य आपल्याला भावुक करते. तुम्ही तुमच्या त्या भावनांतून बाहेर कसे पडाल? क्रिकेट खेळाडू विराट कोहली इंग्लंडच्या दौऱ्यावर जातो, बाद होतो. त्याची सरासरी इंग्लंडमध्ये सर्वात कमी असते. तो फलंदाजीला आल्यावर प्रत्येक गोलंदाज म्हणतो, मला संधी द्या. कारण, विराट आॅफ स्टम्पच्या बाहेर खेळू शकत नाही. विराट पुन्हा इंग्लंडला जातो आणि तीन शतकांची खेळी करतो. सारे जग त्याला श्रेष्ठ फलंदाज म्हणू लागते, ‘किंग कोहली’ नाव दिले जाते. तो सामोरा गेला, त्या भावनांना इथे महत्त्व नाही, तो कसा परतला हे महत्त्वाचे आहे.
आयुष्यात किती वेळा अपयश आले, आयुष्याने किती वेळा दगा दिला, ज्याच्यासाठी तयार नव्हतो अशा अवस्थेत किती वेळा टाकले या सगळ्या गोष्टींनी मला भावुक केले. जगातील बहुतांश लोक या भावनांमध्ये गुरफटून जातात. आजी-आजोबा, आई-वडील किंवा तुमच्या जवळच्या अनेकांची कहाणी ऐकली तर लक्षात येईल, त्यांनाही त्यांच्या आयुष्यात काही प्रसंगी अपयश आलेले असते, एखाद्याने दगा दिला. एखादा निर्णय चुकला असेल आणि यामुळे ते दु:खी झाले असतील. पण, अनेक लोक आजही स्वत:ला अपयशी समजतात. कारण, तीच भावना त्यांच्या मनात घर करून राहते. आयुष्यात भावनिक होणे, दु:खी राहणे खूप सोपे आहे.
तुम्ही भावुक होऊ नका, असे मी म्हणणार नाही. भावनिक होणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. भावना ओसरल्यानंतर काय घडते? तुम्ही भावनांमध्येच बुडून राहता? की हात उंचावून आयुष्याला सांगता, मी परतलोय! यशस्वी झालेल्यांचीही कथा अशीच आहे. त्यांच्या वाट्याला असेच काही तरी आलेले असते, त्या वेळी ते भावुक झालेले असतात. स्टीव्ह जॉब्ज ते मार्क झुकेरबर्ग, जेफ बेजोस आणि बिल गेट्स अशा प्रचंड यशस्वी लोकांकडे पाहा. त्यांच्या आयुष्यात अपयश, खूप साऱ्या भावना दिसतील. पण, ते त्या अवस्थेतून बाहेर पडले आणि कोणते पर्याय निवडले, कोणते निर्णय घेतले, आयुष्यात पुन्हा कसा परतलो, हे त्यांनी सांगितले.
भावना ओसरल्यानंतर तुम्ही काय केले, यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. तेच ठरवत असते की, तुम्ही सामान्य जीवन जगाल की आयुष्य पुढे घेऊन जाल. भावनिक झाल्यानंतर त्यातून कसे परततो, हीच गोष्ट जगाचे नेतृत्व करणाऱ्यांना त्यांच्या अनुयायांपासून वेगळे बनवते.
महात्रया रा
आध्यात्मिक गुरू
infinitheism.com/wisdom
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.