आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादफनभूमी व स्मशानभूमीसाठी आरक्षण प्रस्तावित करून सुमारे ३२ कोटी रुपयांना ती जागा घेण्याच्या महासभेच्या निर्णयाला केवळ १५ नगरसेवकांनीच लेखी विरोध दर्शवला आहे. राजकीय पक्षांनी विरोधाची भूमिका मांडली असली, तरी त्यांच्या सर्व नगरसेवकांनी अद्याप लेखी विरोध केलेला नाही. त्यामुळे तब्बल ५८ नगरसेवकांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचे चित्र आहे.
पूर्वीची आरक्षित जागा मनपा कायद्यानुसार बळजबरीनेही ताब्यात घेऊ शकत असताना ते टाळून नवी खासगी घेण्याच्या निर्णयास शहरातून जोरदार विरोध होत आहे. महासभेत हा विषय चर्चेला आला तेव्हा सभागृहात सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब बोराटे व अमोल येवले, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनिल शिंदे, मदन आढाव व संग्राम शेळके आणि काँग्रेसच्या शीला चव्हाण यांनी लिखीत विरोध केला.
त्यानंतर काँग्रेसचे आसिफ सुलतान यांच्यासह नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार व रिजवाना शेख, राष्ट्रवादीचे समद खान, नजीर अहमद शेख (नज्जू पहेलवान) व परवीन कुरेशी बसपाचे अक्षय सोनवणे आणि भाजपचे प्रदीप परदेशी यांनी संबंधित झालेला ठराव विखंडीत करण्याची मागणी केली. त्यानंतर या नगरसेवकांना महापौर रोहिणी शेंडगे यांनी महासभेत याविषयावर चर्चा का केली नाही, असा सवाल विचारला.
भाजपच्या पाच नगरसेवकांनी सभेपूर्वीच आरक्षण प्रस्तावित करण्याचे सुचवून या विषयाला समर्थन दर्शवले आहे. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी महापौर शेंडगेंवर जबाबदारी ढकलून या निर्णयास भाजपचा विरोध असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यांचा एक नगरसेवक वगळता कुणीही लेखी विरोध दर्शवला नाही. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी लेखी विरोध केला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उर्वरित नगरसेवकांनी मात्र अद्यापही लेखी विरोध न केल्याने त्यांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचे चित्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.