आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामार्गांवरील धोकादायक वळणे, चढ-उतार यासह बेशिस्त वाहतूक, नियमांचे उल्लंघन, वेग मर्यादेचे उल्लंघन अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वारंवार अपघात होणाऱ्या ठराविक ५५ 'ब्लॅक स्पॉट'वर मागील ३३ महिन्यात तब्बल ४६७ जणांचा बळी गेला आहे. मानवी चुकांसह रस्त्यांची दुरवस्था, खड्डे व वाहतुकीच्या नियोजनातील अभाव या अपघांसाठी कारणीभूत ठरत आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात वारंवार प्राणांतिक अपघात होणाऱ्या घटनास्थळांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यात नगर - पुणे, नगर - औरंगाबाद, नगर - कल्याण, नगर - सोलापूर, नगर - जामखेड, नगर - नाशिक, नगर - दौंड या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर ४७ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. तर राज्य महामार्गावर २ व इतर महामार्गावर ६ असे एकूण ५५ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
या ब्लॅक स्पॉटवर सन २०२० ते सप्टेंबर २०२२ या ३३ महिन्यात झालेल्या अपघातात ४६७ जणांना जीव गमावावा लागला आहे. यात नगर शहरातील चार ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी ३३ महिन्यात ४७ जणांचा बळी गेला आहे. रस्त्यांची दुरावस्था, बेशिस्त वाहतूक, नियमांचे उल्लंघन यासह शहरातून होणारी अवजड वाहतूक अशा अपघातांना आमंत्रण देत आहे.
जनजागृतीसह उपाययोजनांवर भर महामार्गावर निश्चित करण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी ब्लिंकिंग लाइट्स लावणे, दक्षतेने फलक लावणे आदी उपाययोजनांसह जनजगृती केली जात आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल कार्यान्वित करण्यात येत आहेत. नव्याने झालेल्या उड्डाणपुलामुळे चांदणी चौक, सक्कर चौक, मार्केट यार्ड चौक असे दोन - चार ब्लॅक स्पॉट कमी होणार आहेत.'' अनिल कातकाडे, उपअधीक्षक, नगर
अपघाताची ही आहेत प्रमुख कारणे अतिवेगाची नशा, हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे, धोकादायक ओव्हरटेकिंग, लेन कटिंग, मद्यपान करून गाडी चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे, चालकांवरील अतिताण, रस्त्यात कुठेही गाडी उभी करणे यामुळे बहुतेक अपघात होतात. टायर फुटणे, जनावर रस्त्यात आडवे येणे, पादचाऱ्यांची चूक, दरड कोसळणे, वाहतुकीची कोंडी यामुळेही अपघात घडतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.