आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प 2023:ढवळपुरीत हाेणार दहा हजार काेटींचा प्रकल्प‎

बंडू पवार | नगर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नव्याने‎ सुरू होणाऱ्या महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास‎ महामंडळाचे मुख्यालय नगर जिल्ह्यातील ढवळपुरी‎ (ता.पारनेर) येथे होणार आहे. या प्रकल्पासाठी दहा‎ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.‎ ढवळपुरी येथील ३५ एकर गायरान जागेवर हा प्रकल्प‎ साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून शेळी व‎ मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना ७० टक्के बीज‎ भांडवलाद्वारे कर्ज उपलब्ध होणार आहे.‎ पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी,मेंढी‎ महामंडाकडून ढवळपुरी येथे हा प्रकल्प सुरू होणार‎ आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्या‎ सहाय्याने हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.‎ नगरसह राज्यभरातील बारा लाख लाभार्थी यांना‎ शेळी मेंढी पालन करण्यासाठी भांडवल या‎ प्रकल्पातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.‎ अत्याधुनिक प्राणी प्रजाती निर्मिती, शास्त्रोक्त पालन‎ मिशन व प्रक्रिया याची सांगड या प्रकल्पात घातली‎ जाणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यात‎ नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात‎ येणार आहे.‎

आगामी निवडणुका डोळ्यासमोर‎ ठेवून घोषणांचा पाऊस‎ ‎
‎ अर्थसंकल्पात शेतीमालाला रास्त भाव देण्याबद्दल ब्र‎ शब्द काढण्यात आलेला नाही. कांदा, कापूस,‎ सोयाबीन, चिकन, अंडी, तूर, हरभरा पिकांचे भाव‎ कोसळत असताना ते सावरण्यासाठी कोणतीही योजना‎ आणलेली नाही. शेतीमालाला रास्त दाम मिळावे‎ यासाठी ठोस तरतूद केलेली नाही.शेतकऱ्यांनी जे‎ कधीच मागितलं नव्हते ते शेतकऱ्यांना देऊन आम्ही‎ शेतकऱ्यांसाठी किती चांगले करतोय असे‎ दाखवण्याचा प्रयत्न करायचा असा हा प्रकार आहे.‎ दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग‎ लोकप्रियता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून‎ केलेल्या या घोषणा आहेत.‎- डॉ. अजित नवले, केंद्रीय सहसचिव भाकप.‎

पंचामृताचे नाव देऊन‎ राज्यातील जनतेसोबत धोका‎
अर्थसंकल्पात शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे‎ फुलवण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत‎ नाही, अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. एकीकडे‎ अवकाळी पाऊस, दुसरीकडे अर्थसंकल्पात घोषणांचा‎ पाऊस यामुळे महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे.‎ पंचामृताचे नाव देऊन महाराष्ट्रातील जनतेसोबत धोका‎ करण्यात आला. या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्रातला‎ शेतकरी, तरुण, महिला, मध्यमवर्गीय मोठ्या आशेने‎ बघत होता. शेतकऱ्यांसाठी कोणतेही रचनात्मक पाऊल‎ या अर्थसंकल्पात दिसत नाही. वास्तव आणि सत्याचे‎ भान विसरलेला आणि निव्वळ आगामी निवडणुका‎ डोळ्यासमोर ठेवून मतदारांच्या डोळ्यात धुळफेक‎ करणाऱ्या, घोषणांच्या खैरातीचे वाटप आज करण्यात‎ आले. - बाळासाहेब थाेरात, आमदार.‎

सरकारकडून जुन्या‎ पेन्शन बाबत ठोस‎ भूमिका गरजेची‎
शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी‎ प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. घोषणा आणि वस्तुस्थिती यामध्ये मोठा फरक‎ असून अर्थसंकल्पात जुन्या पेन्शन बाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे होते, अशी‎ प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.‎

सर्वच घटकांना प्रगतीच्या‎ दिशेने नेणारा अर्थसंकल्प
शेतकऱ्यांसह समाजातील सर्वच‎ घटकांना प्रगतीच्या दिशेने नेणारा‎ अर्थसंकल्प आहे. अमृतकाळातील‎ पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येय‎ युक्त असलेला अर्थसंकल्प‎ जनभागीदारीतून तयार‎ झाला.शाश्वत शेती हा उद्देश‎ डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांसाठी‎ अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली‎ आहे. महिला, आदिवासी,‎ मागासवर्ग, ओबीसींसह सर्व‎ समाजघटकांचा सर्वसमावेशक‎ विकास, भरीव भांडवली‎ गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा‎ विकास , रोजगारनिर्मिती, सक्षम,‎ कुशल, रोजगारक्षम युवा,‎ पर्यावरणपूरक विकास अशा बाबी‎ अर्थसंकल्पात आहेत.‎- अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष, दक्षिण भाजप.‎

गरीब, शेतकऱ्यांचे कल्याण‎ करणारा अर्थसंकल्प
अमृतकाळातील हा पहिला‎ अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर व‎ ‘सर्वजन हिताय’ या संकल्पनेवर‎ आधारित आणि सर्वांना न्याय देणारा‎ सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या‎ अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्गीय,‎ शेतकरी, शेतमजूर,कामगार,‎ उद्योजक, युवक, महिला अशा सर्व‎ क्षेत्रातील लोकांचा व समाजातील‎ शेवटच्या घटकाचा विचार करण्यात‎ आलेला आहे. शिंदे-फडणवीस‎ सरकारने राज्याच्या सर्वांगीण‎ विकासाला चालना देण्यासाठी‎ अनेक योजना राबविण्याची घोषणा‎ या अर्थसंकल्पात केली आहे. हा‎ अर्थसंकल्प गरीबांचे, कामगारांचे‎ आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा‎ आहे. - स्नेहलता कोल्हे, प्रदेश‎ सचिव,भाजप.‎

बातम्या आणखी आहेत...