आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान:काढणीला आलेला गहू भिजला, प्राथमिक पाहणीनंतर करणार पंचनामे

अहमदनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू भिजण्याच्या मार्गावर आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील संगमनेर, कोपरगाव सह अन्य तालुक्यात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याची माहिती घेण्याचे निर्देश सर्व तालुक्यांना देण्यात आले असून या माहितीनंतरच किती प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. यावर पंचनाम्याची प्रक्रिया केली जाईल अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांनी मंगळवारी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण नंतर सोमवार (6 मार्च )ला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शहरात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारावा निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यरात्री देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मंगळवारी पहाटे सहा वाजता कमी अधिक प्रमाणात शहरात पाऊस झाला. दुपारी देखील जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळीने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.

नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता. सायंकाळी पाच वाजल्यापासून विजेचा कडकडाटात सुरू होता. सायंकाळी सात वाजता शहरातील अनेक भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे सायंकाळी सात वाजता घरोघरी होळी पेटवण्याची तयारी सुरू असतानाच पावसाचे आगमन झाले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या गहू घरात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली त्याचबरोबर काही भागात काढणीला आलेला गहू देखील भिजला आहे. गव्हाबरोबरच हरभरा पिकाला देखील या अवकाळी चा फटका बसला आहे.

अवकाळी पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, तापमान देखील घसरले आहे. दिवसभर शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते.दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाची प्राथमिक माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आले असून प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन नुकसानीची माहिती घेतल्यानंतरच पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे जिल्हाधिकारी साळीमठ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...