आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निकालामुळे राज्यातील भाजप व (शिंदे गट) शिवसेना सरकारच्या विरोधातील जनतेच्या मनातील प्रक्षोभ प्रकट झाला असून, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भाजपा व (शिंदे) शिवसेनेचा धुव्वा उडवेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी गुरुवारी व्यक्त केला.
देशमुख म्हणाले, कसब्यातील निवडणूक ही सत्ताधारयांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. साम, दाम, दंड, भेद यासह सरकारी यंत्रणेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाला.या निवडणुकीत सत्ताधारयांनी पैशाचाही प्रचंड वापर केला. तरी देखील सर्वसामान्य जनतेने रवींद्र धंगेकरांसारख्या तळागाळातील कार्यकर्त्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. ही घटना देशातील आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी आहे." असे देशमुख यांनी सांगितले.
देशमुख म्हणाले,याआधी झालेल्या विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात देखील काँग्रेसने असाच आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. नागपूरच्या निमित्ताने प्रथम रेशीम बागेत आणि कसब्याच्या निमित्ताने आता नातू बागेत झालेला भाजपचा पराभव हा त्यांना जिव्हारी लागणारा असुन त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मिळालेला गंभीर इशारा आहे. प्रत्येक निवडणुकीत होत असलेला सत्तेचा गैरवापर, घटनात्मक संस्थांचा गैरवापर, विरोधकांवर दबाव तंत्राचा वापर, ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर याचा अतिरेक झाल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात देखील तिटकारा निर्माण झाला आहे. आणि याचेच प्रतिबिंब कसब्याच्या निवडणुकीत उमटलेले दिसले.
देशमुख म्हणाले,पिंपरी चिंचवड निवडणुकीचा निकाल जरी भाजपच्या बाजूने लागलेला असला तरी त्या ठिकाणी नाना काटे व राहुल कलाटे यांच्या एकत्रित मतांची बेरीज ही विजयी उमेदवारापेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ तिथेही बहुसंख्य मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कौल दिलेला आहे.आगामी काळात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एक दिलाने निवडणुकीला सामोरे गेले तर महाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे शिवसेना गटाचा पराभव अटळ आहे, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.