आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार रोखण्याची जबाबदारी असलेल्या नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच चक्क "काळी बाहूली'' लटकवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेली काळी बाहुली १५ महिन्यांनंतरही आजही तिथेच कायम आहे.
अंधश्रद्धेचा प्रसार व प्रचार रोखण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेबरोबरच पोलिस यंत्रणेवरही आहे. २९ डिसेंबर २०२१ ला नगरचे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय नगर -छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे सुरू झाले होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण झाले होते.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावरच्या मुख्य लाकडाच्या प्रवेशद्वारावर "काळी बाहुली'' लावली होती. तब्बल पंधरा महिने उलटूनही ही काळी बाहुली प्रवेशद्वारावरून काही हटलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या कालावधीत आमदार निलेश लंके यांचे उपोषण सोडवण्यासाठी आलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या इमारतीची पाहणी करून या देखण्या इमारतीचे कौतुक केले होते.
महसूलमंत्री, जिल्हाधिकारी बदलले "काळी बाहुली'' मात्र कायम
वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत नियमावली तयार करण्यासाठी व चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाते. मात्र नगर जिल्ह्यात आतापर्यंत ही समितीच गठीत करण्यात आलेली नाही. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पाठपुरावा देखील करण्यात आला होता.
अंधश्रद्धेचा प्रसार करणे देखील चुकीचे आहे.राज्यघटनेप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून काम करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारची बाहुली लावणे वैज्ञानिक दृष्टीकोनातून विरोधी भूमिका आहे. रंजना गवांदे, सदस्य, राज्य कार्यकारिणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तत्कालीन महाविकास आघाडीच्या कालावधीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूचे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते.
त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन राधाकृष्ण विखे हे महसूल मंत्री झाले. शिवाय तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची देखील बदली झाली. नवीन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आले, तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेली "काळी बाहुली'' मात्र अद्यापही कायम आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.