आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यासह जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कारवाईच्या नोटीसा पाठवून जमीनी जप्त करून लिलाव करण्याच्या धमक्या देण्याचा सपाटा लावला आहे. नैसर्गिक आपत्तीने पिचलेला सर्वसामान्य शेतकरी भयभीत झाला आहे. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी नगर जिल्हा बँकेला आदेश देवून स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दिनकरराव ताके यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सेवा संस्थाकडून घेतलेले कर्ज फेडणे सर्व शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु कोरोनानंतर सर्वच व्यवसायीक आणि शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात मागिल गळीत हंगामात साखर कारखान्याचे वेळापत्रक बिघडल्यामुळे ऊसतोडणी मजूरानी अनेक ठिकाणी एकरी पंधरा हजारापर्यंत शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अतिवृष्टीचे आसमानी संकट व लंपीमुळे पशुधनाचे होत असलेल्या नुकसानीचीही त्यात भर पडली आहे.
लंपीमुळे जनावरांच्या बाजावर निर्बंध आल्याने जोडव्यवसाय संकटात सापडला आहे. आताच्या आर्थिक संकटात सहकारी साखर कारखान्यासारख्या मोठ्या थकित कर्जदार संस्थांकडून वसूलीला अग्रक्रमक्रम देणे गरजेचे असताना, शेतकऱ्यांना नोटीसा देऊन संकट काळात त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
...बँक जबाबदार राहील
अतिवृष्टीसह लंपी साथरोगाच्या संकटामुळे शेतकरी हवालदील आहेत. त्यातच जिल्हा बँकेने नोटिसा बजावून शेतकऱ्यांवर अन्याय चालवला आहे. अशा परिस्थितीत हताश होऊन, शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले, तर त्यास बँके जबाबदार राहील असा, इशाराही ताके यांनी निवेदनात दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.