आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“जिल्ह्यातील विखे पाटलांच्या किती संस्थांचे वीज बिल माफ झाले आहे? मग हजार-पाचशे रुपयांसाठी शेतकऱ्यांची वीज का तोडता?’ असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर दुटप्पीपणे वागत असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांकडे व उद्योजकांकडे किती वीज बिल बाकी आहे, हे पाहत नाही. विखे पाटलांच्या सिंचन संस्थांचे किती वीज बिल माफ केले, हे सांगत नाही. सरकार आंधळे झाले आहे व त्यांना शेतकऱ्यांचे व जनतेचे प्रश्नच दिसत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील पोपट जाधव या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दानवे आले होते. या वेळी त्यांनी सरकारवर टीका केली. मागच्या वर्षी अकोळनेर व परिसरातून ९० टक्के वसुली झाली होती. यंदा पावसाने खरिपाचे पीक नुकसानीत गेले. आता रब्बीची आशा असताना आणि पुरेसे पाणी असतानाही वीज बिलाच्या वसुलीसाठी रोहित्रांचीच वीज तोडली जात आहे. सरकारचे धोरणच चुकीचे आहे. अकोळनेरला हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. या कुटुंबाच्या यातना जनतेसमोर आल्या आहेत, त्यामुळे आता सरकारविरोधातील तीव्र भावना पाहता शेतकरीच रस्त्यावर उतरतील, असा दावाही त्यांनी केला. आम्ही सत्तेवर असतानाही जनतेच्या बाजूने होतो व आताही विरोधात असलो तरी जनतेच्याच बाजूने आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत देण्याबाबत सरकार संवेदनशील नाही. काहींना फक्त ही मदत दिली व अजूनही अनेकांना ती पोहोचली नाही, असा दावा दानवे यांनी केला. राज्य व केंद्र सरकार आणि शेतकर्यांच्या पैशांतून विमा कंपन्या चालतात. २० टक्के फायदा यात त्यांचा होतो, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.