आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्म-धर्मातील व समाजातील द्वेष संपविण्यासाठी व प्रेम, शांतता आणि भाईचार्याचा संदेश घेऊन नागपूर ते मुंबई इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल इन्साफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुफ्ती सालम चाऊस यांनी दिली. शिवजयंतीच्या दिवशी रविवारी (१९ फेब्रुवारी) अल इन्साफ फाऊंडेशनच्या वतीने नागपूर येथून इंन्साफ लाओ, देश बचाओ, हिंदू-मुस्लिम नफरत मिटाओ, हे ब्रीदवाक्य घेऊन इन्सानियत अभियान रॅली काढण्यात येणार आहे.
तर ही रॅली १ मार्च रोजी अहमदनगर शहरात दाखल होत असून, याच्या नियोजनार्थ सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृहात बैठक पार पडली. यावेळी मुफ्ती सालम बोलत होते. या बैठकीला वाहद बिनसाले चाऊस, मौलाना रियाज अहमद, वसीम सय्यद, मुस्ताक सर, हाफिज फैजान आदी उपस्थित होते. मुफ्ती सालम म्हणाले, या इन्सानियत अभियान रॅलीत राजकीय पक्ष व धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत. देशाच्या एकता, अखंडता व एकात्मतेसाठी हे अभियान आहे.
पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन देशातील शांततेसाठी सर्वांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ही रॅली नागपूरहून अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार आहे. धर्मांधते विरोधात इन्कलाबचा नारा असून, यामध्ये ४० सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याची सहमती दर्शवली आहे. अहमदनगर शहरात देखील या रॅलीचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. याचा समारोप मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.