आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापैसे टाकून देखील थेंबभर पाणी मिळत नसल्याचा विचित्र अनुभव काही नागरिकांना बुधवारी व गुरुवारी आल्याने राहुरी नगरपरिषदेची जीवनधारा मोबाईल वाॅटर एटीएम ही आरओचे शुद्ध पाणी देणारी योजना अवघ्या तीन दिवसांत वादाच्या भोवऱ्यात सापडली. ही तर पैसे खाणारी योजना आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.
३ एप्रिलला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे तसेच माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व नगर परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या साक्षीने जीवनधारा मोबाईल वाॅटर एटीएम ही पैसे टाकून पाणी देणारी योजना राहुरी शहरातील विविध भागात सुरू करण्यात आली. बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर ही योजना राबवण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्यात सुरू झालेला मोबाईल वाॅटर एटीएम हा उपक्रम तहानलेल्या नागरिकांच्या दृष्टीने दिलासा देणारा ठरेल, ही अपेक्षा बाळगली जात असताना मात्र बुधवार व गुरुवारी पाणी भरण्यासाठी आलेल्या नागरीकांना मशिनमध्ये पैसे टाकून देखील पाणीच मिळत नसल्याचा वाईट अनुभव आला. याबाबत काही नागरिकांनी तक्रार तोंडी तक्रार केली असता संबंधिताकडून सेटिंगचे काम सुरू असल्याचे उत्तर मिळत आहे. जीवनधारा मोबाईल वाॅटर एटीएम या नावाखाली सुरू असलेल्या या योजनेतून पाणी न मिळालेल्या काही नागरिकांनी ही तर पैसे खाणारी योजना असल्याचा संताप व्यक्त केला. तालुक्याचे ठिकाण म्हणून राहुरी शहराची ओळख आहे.
मुळा धरणापासून १४ किलोमीटरच्या थेट पाइपलाइनद्वारे शहराला पाण्याचा पुरवठा केला जात आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. मात्र, कमी दाबाने पाणी मिळणाऱ्या शहर तसेच उपनगरातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आजही सुरू आहे. नगर परिषदेच्या २९ कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणी योजनेचे काम चार महिन्यापासून शहरात सुरू असले तरी ठेकेदाराकडून करारानुसार काम केले जाते? हा सवाल वादाचा ठरला. नवीन पाइपलाइन टाकताना अनेक भागात जुन्या नळांची तुटफूट झाल्याने पाणी पुरवठा खंडित होण्याच्या घटना नागरिकांना वेठीस धरल्याप्रमाणे ठरल्या. पाणी पुरवठा खंडित झालेल्या प्रभागात टँकरद्वारे पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता मिळत आहेत. राहुरी पालिकेच्या सत्ताधारी व विरोधी असलेल्या कारभारी मंडळीची मुदत महिनाभरापूर्वी संपलेली असल्याने पालिकेवर प्रशासकीय राज आले. मात्र, पालिकेच्या सर्वच विभागात गलथान कारभार सुरू असल्याने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरीत नागरी सुविधांबाबत दयनीय अवस्था झाली.
नळावर पाण्यासाठी झुंबड
बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर राहुरी नगर परिषदेकडुन ही योजना राबवण्यात आली. या योजनेतून एक रुपयात एक लिटर, पाच रुपयात सात लिटर, तर बारा रुपयात २० लिटर पाणी मिळणार असल्याचा फलक वाहनांवर झळकत आहे. राहुरी नगरपरिषद पाण्याच्या टाकीजवळच जीवनधारा मोबाईल वाॅटर एटीएमचे पाणी भरण्याचे युनिट सुरू करण्यात आले. मात्र पैसे टाकून पाणी मिळत नसल्याने नागरिकांची पाणी टाकीलगत असलेल्या नळावर झुंबड उडाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.