आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरती पासचा काळाबाजार:साईदर्शनासाठी शिफारशी बंद; शिर्डी येथे ग्रामस्थांसोबतच्या बैठकीनंतर सीईओ राहुल जाधव यांचा निर्णय‎

प्रतनिधी | शिर्डी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी‎ अधिकारी राहुल जाधव यांनी मंगळवारी‎ (ता. २) सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक‎ घेऊन महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला.‎ त्यात आरती पासचा काळाबाजार‎ रोखण्यासाठी यापुढे कोणाचीही‎ शिफारस चालणार नाही. साईसंस्थान‎ कर्मचारी व ग्रामस्थांनाही आता‎ साईदर्शनासाठी कडक नियमांचे पालन‎ करणे बंधनकारक असेल. साईभक्तांसह‎ ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले‎ आहे.‎

साईबाबा संस्थान व ग्रामस्थांमध्ये‎ प्रशासन बैठकीत दर्शन व आरतीसाठी‎ विविध नियमावलीबाबत चर्चा करण्यात‎ आली. यात साई समाधी मंदिरात‎ जनसंपर्क कार्यालय, सुरक्षारक्षक, मंदिर‎ कार्यालय व संपूर्ण परिसरात गेट नं. १,‎ २, ३, ४ व ५ या ठिकाणी‎ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणताही‎ कर्मचारी मोबाईल वापरू शकत नाही,‎ आजवर आरतीसाठी मिळणारे सशुल्क‎ पासेससाठी शिफारस सक्तीची होती,‎ मात्र आता ती हटविण्यात आली आहे.‎ द्वारकामाई, गुरुस्थान, समाधी मंदिर या‎ सर्व ठिकाणचे बॅरिगेटस् हटविण्यात‎ आले आहेत. ग्रामस्थांसाठी गेट नं. ३ हे‎ गावकरी दर्शन प्रवेश गेट असणार आहे,‎ मात्र या ठिकाणी फक्त शिर्डी ग्रामस्थांना‎ प्रवेश असेल. प्रत्येकाचे ओळखपत्र‎ तपासूनच प्रवेश देऊन त्याची नोंद‎ ठेवण्यात येणार आहे.‎

विशेष म्हणजे, कोणत्याही गेटने प्रवेश‎ करून कोणीही आपले नातेवाईक, मित्र‎ व अन्य व्हीआयपी विनापास प्रवेश‎ केल्यास त्या ठिकाणी तैनात असणाऱ्या‎ सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांवर कडक‎ कारवाई केली जाणार आहे. कोणताही‎ ग्रामस्थ विना पास प्रवेश करून आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना विनापास दर्शनाचा आग्रह करीत असेल, तर त्याच्यावरही कडक कायदेशीर‎ कारवाई करण्याचे अधिकार साई‎ संस्थान प्रशासनाला देण्यात आले‎ आहेत. त्याची त्वरित अंमलबजावणी बुधवारपासून (ता. ३) लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची‎ माहिती राहुल जाधव यांनी माध्यमांना‎ दिली.‎ ही नियमावली सर्वांसाठी एकसारखी असणार आहे. या निर्णयामुळे अनेक‎ अपप्रवृत्तीला चाप बसणार आहे.

दर्शनाचा‎ काळाबाजार, व्हीआयपी सशुल्क पासेसचा‎ गोरखधंदा व फुकट दर्शन घडवून आणून,‎ दररोजची कमाई करणाऱ्या टोळ्यांवर व‎ त्यात सामील असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर‎ आता कारवाईची संक्रात आली आहे.‎ राहुल जाधव यांच्या धाडसी निर्णयामुळे साई संस्थानमधील नियम धाब्यावर‎ बसवणारे अनेक अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांनी जाधव यांची धास्ती घेतली‎ आहे. या निर्णयामुळे शिर्डी ग्रामस्थ व‎ कर्मचाऱ्यांवरही अंकुश आला असून,‎ संस्थांनच्या कारभारात नक्कीच‎ पारदर्शकता येईल, असा विश्वास‎ ग्रामस्थांनी व्यक्त केला.‎

लवकरच नवीन दर्शनरांग‎

नवीन दर्शनरांग लवकरच सुरू होणार‎ असून, त्यात काही सूचना आल्या आहेत.‎ त्यावर अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन प्रत्येक‎ भाविकांचे शांत, सुलभ व सुरक्षित दर्शन‎ कसे होईल, यावर भर दिला जाणार आहे.‎ यासाठी त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष‎ सुधाकर यार्लागुडडा, जिल्हाधिकाऱ्यांचे‎ सहकार्य व मार्गदर्शन लाभल्यानेच हे निर्णय‎ होऊ शकल्याचे जाधव यांनी सांगितले.‎