आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बालकामगारांच्या शोधासाठी रविवार (12 जून) पासून कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष पथकांमार्फत शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आस्थापना आणि दुकानांची तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती रविवारी कामगार सहाय्यक आयुक्त नितीन कवले यांनी दिली. दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त रविवारी अहमदनगर शहरात कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय व अहमदनगर चाईल्ड लाईनच्या वतीने बालकामगार प्रथेविरुद्ध फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली.
शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आस्थापना आणि दुकानांमध्ये असलेल्या बालकामगारांच्या शोधासाठी कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयाने रविवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आस्थापना, कारखाने, हॉटेल्स, गॅरेजेस, विटभट्या या ठिकाणी बाल कामगार आढळल्यास कामगार विभागाकडे तक्रारी करण्याचे आवाहन कवले यांनी यावेळी केले. बालकामगार विरोधी दिनानिमित्त स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कवले बोलत होते.सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख,तुषार बोरसे, अंबादास केदार, प्रकाश भोसले, अमोल गायकवाड तसेच ऍड. अनुराधा येवले , महेश सूर्यवंशी, वैभव देशमुख आदी उपस्थित यावेळी होते.
जिल्हा बालकामगार मुक्त करणार
जिल्ह्यात बालमजुरीचे प्रमाण खूप वाढले आहे. हॉटेल व उदयोग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बालमजूर ठेवण्याचे प्रमाण वाढते आहे. बालमजूर कमी मजुरीत कितीही तास राबवून घेतले जातात. शेतात मजूर मिळत नसल्याने लहान मुलांचा वापर वाढला आहे. स्थानिक पातळीवर कोणीच वाईटपण घेत नाही. अहमदनगर जिल्हा बाल कामगार मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे, असे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.