आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर अर्बन बँकेच्या २०१४ ते २०१९ या काळातील संचालकांनी व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या पासपोर्टची साक्षांकित प्रत आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संचालक व अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय नगर सोडू नये, असेही निर्देश देण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली.
बँकेतील २८ कर्ज प्रकरणांत सुमारे १५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेली आहे. या तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी दिल्याने आदेशामुळे बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. गैरव्यवहाराच्या तक्रारीचा तपास करताना त्या पाच वर्षांच्या काळातील सर्वच कर्जप्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. त्यासंदर्भातील प्राथमिक अहवाल न्यायालयास सादर झाल्यावर व त्यात गंभीर निरीक्षणे असल्याने संबंधित पाच वर्षांच्या काळातील संचालक व अधिकारी फरार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मालमत्तांची विल्हेवाटही लावण्याची शक्यता असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी फिर्यादी गांधी यांनी अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने संबंधित संचालकांनी त्यांच्या पासपोर्टची साक्षांकित प्रत जमा करावी. तसेच पोलिसांच्या परवानगीशिवाय नगर सोडू नये, असे आदेश दिले आहेत.
बँकेच्या पाच शाखा बंद होणार?
नगर अर्बन बँकेच्या पाच शाखा लवकरच बंद होण्याची चिन्हे असल्याचा दावा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला आहे. बँक मल्टिस्टेट होण्यापूर्वी बँकेच्या ४७ शाखा होत्या. प्रशासक कालावधीत सहा शाखा बंद झाल्या व आता आणखी पाच बंद होणार असल्याने बँकेच्या ३६ शाखा आता राहण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.