आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील विविध नदीपात्रातील वाळू साठ्यांची होणारी ऑनलाइन लिलावांची प्रक्रिया गौण खनिज विभागाने गुरुवार (9 जून) पासून थांबवली आहे. त्यामुळे 12 पैकी लिलाव न झालेले 6 वाळू साठे गौण खनिज विभाग आपल्या ताब्यात घेणार आहे, अशी माहिती गुरुवारी गौण खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, राहुरी, श्रीगोंदे या चार तालुक्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा या नदीपात्रातील वाळू लिलावासाठी 12 वाळू साठे निश्चित करण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांत या वाळू साठ्यांसाठी चार वेळा ऑनलाइन लिलाव झाले. मात्र, 12 पैकी सहाच वाळू साठ्यांचे लिलाव झाले होते.
उर्वरित 6 वाळू साठ्यांचे लिलाव झालेच नाही. लिलावाची मुदत गुरुवारी संपुष्टात आल्याने गौण खनिज विभागाने उर्वरित सहा वाळू साठे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे झालेल्या सहा वाळूसाठ्यांतील 11 हजार 294 ब्रास वाळूच्या लिलावातून 1 कोटी 46 लाखांचा महसूल मिळाला आहे. अन्य 6 वाळू साठ्यांचे लिलाव झाले असते तर आणखी दीड कोटीचा महसूल प्रशासनाला मिळाला असता. मात्र, लिलाव न झाल्याने या महसुलावर प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. मान्सूनच्या पावसामुळे पुढच्या 3 महिन्यांसाठी वाळू उपसा बंद राहणार आहे.
चार वेळा ऑनलाइन निविदा
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील 4, राहुरी तालुक्यातील मुळा नदीतील 1, श्रीगोंदे तालुक्यातील भीमा नदीतील 1, अशा 6 वाळू साठ्यांचा आतापर्यंत लिलाव झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील 2, श्रीगोंदे भीमा नदी पत्रातील 3, राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातील 1 अशा सहा वाळू साठ्यांचे लिलाव झाले नाहीत. लिलावासाठी 4 वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. लिलावाची मुदत गुरुवारी संपुष्टात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.