आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरी पॅटर्न:राज्यात प्रथमच ‘मिशन आपुलकी’तून‎ 1 हजार 800 शाळांचा कायापालट‎

‎‎दीपक कांबळे | नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांवर‎ शाळा आहेत. या शाळांमध्ये भौतिक‎ सुविधा पुरवण्यासाठी निधीची नेहमीच‎ अडचण भासते. यावर तोडगा‎ काढण्यासाठी राज्यात प्रथमच १ मे २०२२‎ रोजी जिल्हा परिषदेने ‘मिशन आपुलकी’‎ उपक्रम हाती घेतला आहे. या‎ अभियानातून १५ वर्गखोल्यांच्या‎ उभारणीसह १८०० शाळांना १३ कोटींचे‎ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या‎ उपक्रमाचा ‘नगरी पॅटर्न’ राज्याला‎ दिशादर्शक ठरत आहे.‎ तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व‎ विद्यमान अतिरिक्त मुख्य कार्यकारी‎ अधिकारी यांच्या कार्यकाळात १ मे २०२२‎ पासून ‘मिशन आपुलकी’ हा उपक्रम हाती‎ घेण्यात आला. या महत्वपूर्ण अभियानाला‎ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष‎ येरेकर यांनी गती दिली. जिल्हा प्राथमिक‎ शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, तसेच‎ शिक्षण विभागातील समन्वयक रमेश‎ कासार यांनी विविध कंपन्यांकडून‎ ‘सीएसआर’ निधी मिळवण्यासाठी‎ प्रस्ताव दाखल केले. लोकांनी शाळांचा‎ कायापालट करण्यासाठी पुढाकार घेत‎ ‘मिशन आपुलकी’चे स्वागत केले.‎ आतापर्यंत सुमारे दीड कोटींच्या निधीतून‎ १५ वर्गखोल्यांची उभारणी झाली आहे.‎

शाळांचा कायापालट कसा झाला?‎जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये आता‎ संगणकासह एलईडी संच उपलब्ध करून देण्यात‎ आले आहेत. त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह बोर्ड‎ (डिजिटल फळे) ४५० शाळांमध्ये उपलब्ध‎ करून दिले आहेत. शंभर टक्के शाळांत वीजजोड‎ देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर माहिती मागवून‎ वीजबिलाची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच‎ विजेसाठी इतर पर्यायही विचाराधीन आहेत.‎

१५० शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट‎‘मिशन आपुलकी’तून जिल्ह्यातील १५० शाळांवर‎ सौरऊर्जा पॅनेल उभारणी करण्याचे नियोजन आहे.‎ सौरऊर्जेतून वीज उपलब्ध होईल. त्याचबरोबर १००‎ टक्के शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड (डिजिटल‎ फळे) उपलब्ध करून या शाळा डिजिटल‎ करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुशंगाने विविध‎ संस्थांनाही पत्र देण्यात आले आहे.‎ - भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी‎

तसेच शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड‎ (डिजिटल फळे), शुद्ध पाण्यासाठी‎ वॉटर फिल्टर, संगणक आदी साहित्य‎ उपलब्ध करून दिले आहे. असा उपक्रम‎ राबवणारी अहमदनगर ही राज्यातली‎ पहिलीच जिल्हा परिषद ठरल्याचे‎ प्रशासनाने सांगितले.‎ जिल्ह्यात सुमारे ८०० वर्गखोल्या‎ उभारण्याची आवश्यकता आहे. यासाठी‎ जिल्हा नियोजनचा निधी अपुरा पडत‎ आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय‎ पर्याय नाही.‎

‘मिशन आपुलकी’चा अर्थ?‎जिल्ह्यामध्ये शिक्षण घेऊन विविध पदांवर‎ भरारी घेतलेल्या माजी विद्यार्थी, तसेच‎ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी‎ आपुलकीच्या नात्याने शाळेला शैक्षणिक‎ साहित्याची मदत करणे, हा प्रमुख हेतू या‎ उपक्रमामागे आहे. त्याचबरोबर विविध‎ सामाजिक संस्था, प्रतिष्ठान,‎ कंपन्यांकडूनही आपुलकीच्या नात्याने‎ जिल्हा परिषदेने मदतीचे आवाहन केले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...