आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश व राज्य पातळीवर विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. मागील काळात मंदिर व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता नुपुर शर्मा प्रकरणामुळे सोशल मीडियात पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट वायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी एका युवकाने लाल किल्ला व तिरंगा ध्वजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. बजरंग दलाने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. सोशल मीडियात अशा तणाव निर्माण करणाऱ्या प्रक्षोभक पोस्ट व्हायरल होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आता यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सायबर सेलसह पोलिस ठाण्यामधील गोपनीय शाखांमार्फत त्यांच्या हद्दीतील हालचाली, सोशल मीडियातील पोस्ट आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करताना, सोशल मीडिया पोस्ट करताना खबरदारी घ्यावी. चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.