आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘नगर मनमाड रस्ता अर्धवट; उत्तर -दक्षिण भारतातून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना मनस्ताप” या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी (१७ जून) वृत्त प्रकाशित केले होते. त्याच दिवशी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आलेले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वृत्ताची दखल घेत नगर -मनमाड रस्ता अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदाराला टर्मिनेट ( निलंबित) करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले.
मंत्री गडकरी यांच्या आदेशानुसार पुढची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून या रस्त्याचे कामांसाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. उत्तर व दक्षिण भारतातून शिर्डीकडे नगर शहरामार्गे जाणाऱ्या भाविकांबरोबरच उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या नगर-मनमाड रस्ता तीन वर्षापासून रखडला होता. या रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुहूर्त लागला होता. मात्र या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने हा रस्ता पुन्हा अर्धवट सोडला आहे. त्यामुळे उत्तर-दक्षिण भारतातून शिर्डी कडे येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात रस्त्याने जाणेही होणार कठीण नगर-मनमाड या नवीन कामाची प्रशासकीय पातळीवर सर्व प्रक्रिया पार पडून प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिने या रस्त्यावरून जाणे येणे कठीण होणार आहे. रस्ता नादुरूस्त असल्यामुळे अनेक जण नगर औरंगाबाद मार्गाने नेवासे फाटा ते श्रीरामपूर मार्गे उत्तर जिल्ह्याकडे जात आहे.
रस्त्यावर होणार होते ३१७ कोटी खर्च विळदघाट ते सावळीविहीर (राहाता) या ७५ किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या कामासाठी ३१७ कोटींचा खर्च होणार होता. मात्र या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश दिल्यामुळे आगामी काळात नव्याने निविदा मागवण्याच्या प्रक्रियेत बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणाऱ्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.