आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्राम पंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. तसेच अर्ज स्वीकारण्याची वेळ सायंकाळी साडेपाचपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
तालुक्यात दहा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून २ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. यापूर्वी नामनिर्देशन पत्र ऑनलाइन भरून नंतर त्याची प्रिंट सादर करावयाची असल्याने इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.
मात्र सर्व्हर धीम्या गतीने चालत असल्याने एक अर्ज भरण्यासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागत होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार हवालदिल झाले होते. या बाबत दिव्य मराठीने १ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांची होणारी तारांबळ कमी झाली असून त्यांचा खर्चही वाचला आहे. दरम्यान गुरुवारी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली होती.
उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करावे दहा ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. ज्या इच्छुकांचे संगणक प्रणालीवर अर्ज करणे बाकी आहे. त्यांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाइन सादर करावेत. -समाधान सोनवणे, तहसीलदार
भोंगळ यांनी केली होती ऑफलाइनची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संगीतराव भोंगळ यांनी सुद्धा १ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्य निवडणूक आयोगास ऑनलाइन अर्जामुळे नागरिकांना होणारा त्रास स्पष्ट करून अर्ज ऑफलाइन स्वीकारण्याची विनंती इ मेल द्वारे केली होती. त्यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.