आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टी, दुष्काळजन्य परिस्थिती, दिवसागणिक वाढत जाणारी महागाई, खते व बियाण्यांचे वाढलेले भाव, यासह इतर संकटांना तालुक्यातील शेतकरी नेहमीच तोंड देत असतो. त्यातच या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आज ना उद्या पावसाला सुरूवात होईल, या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन हजार हेक्टर क्षेत्रावर धुळ पेरणी केली आहे. परंतु अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने ही धुळ पेरणी धोक्यात सापडली आहे. त्यासोबतच तालुक्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस न पडल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
मागील काही वर्षांची परिस्थिति पाहता तालुक्यातील शेतकरी हा कोरोना महामारी सोबतच अतिवृष्टी तर कधी दुष्काळागत परिस्थिति, दुबार पेरण्या यासह इतर कारणांमुळे मोठ्या संकटात सापडलेला होता. परंतु या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचे जोरदार आगमन होणार व वेळेत शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्या आशेवर अनेकांनी धूळ पेरणी केली. परंतु अर्धा जून महिना उलटला तरीसुद्धा तालुक्यात अद्यापही पेरणीसाठी योग्य असा पाउस झाला नाही. निसर्गाची शेतकऱ्यांना मिळत असलेली हुलकावणी तसेच नापिकी मुळे आधीच ओढावलेला कर्जाचा डोंगर अशा परिस्थितीत या वर्षी शेती पिकली तर कुटुंबाचा उदरनिर्वाहा बरोबरच कर्ज फेडू या आशेवर शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाताील पेरणी साठी सज्ज झाला आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीला पाऊस पडल्यानंतर वेळेत पेरणी झाली. तर उत्पन्न समाधानकारक होते. परंतु अर्धे मृग नक्षत्र जात असतांना सुद्धा पावसाचा पत्ता नाही. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून ठेवली. तर काहींच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आज उद्या पाऊस येईल अशा आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळा लावून बसला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.