आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदुरा तालुक्यातील रेतीमाफीयांना कुणाचेही भय न राहिल्यामुळे त्यांच्या मुजोरीने कळस गाठला आहे. महसुली विभागातील अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याची घटना ज्ञानगंगा नदीपात्रात धानोरा गावानजीक घडली आहे. अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास रॉयल्टी मागीतली असता त्याने तलाठ्यास ट्रॅक्टर खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आज ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील धानोरा गावानजीक ज्ञानगंगा नदीपात्रात वाळू माफियांनी उच्छाद मांडला असुन त्यांना कुणाचेही भय राहिले नाही. त्यामुळे ते सर्रास अवैधरीत्या वाळू उत्खनन करून त्याची वाहतुक करत आहेत. दरम्यान, १३ जून रोजी सकाळी धानोरा गावाचे तलाठी श्रीकृष्ण नारायण सोळंके हे धानोरा गावातील ज्ञानगंगा नदीपात्रात अचानक गेले असता तेथे विना नंबरचा ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करताना दिसून आला.
यावेळी त्यांनी ट्रॅक्टर चालक रवींद्र साबे रा. धानोरा यास वाळू वाहतुकीची रॉयल्टी आहे का असे विचारणा केली असता त्याने रॉयल्टी नाही, तुला काय करायचे ते कर, असे उत्तर दिले.त्यावर तलाठी सोळंके यांनी त्याला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेण्यास सांगीतले असता त्याने ट्रॅक्टर खाली चिरडून जीवे मारीन अशी धमकी दिली. तसेच धक्काबुक्की करुन ट्रॅक्टर सह पळुन गेल्याची तक्रार तलाठी श्रीकृष्ण सोळंके यांनी केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक रवींद्र साबे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.