आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवासासह व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी शहरातील अतिक्रमण धारकांनी आज ६ डिसेंबर रोजी तहसीलवर कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शहरातील शेकडो अतिक्रमण धारक सहभागी झाले होते. तहसिल कार्यालयावर येताच तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आठवडी बाजार चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा स्टेट बँक चौक मार्गे पंचायत समिती समोरून बस स्थानक चौकातून मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांस निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शहरातील अतिक्रमणधारक मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून विविध प्रभागातील अतिक्रमण धारक शासनाच्या जागेत तसेच गायरान जमिनीवर अतिक्रमण करून लघु व्यवसाय व निवास करीत आहोत. परंतु शासनाने सद्यास्थितीतील सर्व प्रकारचे अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार नगर पंचायत मार्फत शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण काढण्याच्या नोटीस जारी करण्यात आल्या असून ७ डिसेंबर पर्यंत आक्षेप नोंदवण्याचे कळवण्यात आले आहे.
वास्तविक पाहता शहरातील अत्यंत गरीब परिस्थितीत वास्तव्य करणारे अतिक्रमण धारक आहेत. आधीच कोरोनामुळे लघु व्यावसायिकांसह हात मजुरांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता अतिक्रमण हटवल्यास अतिक्रमण धारकांवर उपासमारीची वेळ येऊन कुटुंब बेघर होण्याची पाळी येणार आहे.
तरी अतिक्रमण हटवण्यापूर्वी मानवतेच्या दृष्टिकोनातून शहरातील विविध प्रभागातील लघु व्यावसायिक तथा गायरान जमीनीवर निवासी अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी व निवासासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात शे. मुश्ताक शे. इब्राहिम, संतोष पुंजाजी इंगळे, संदीप एकनाथ ताटवे, रफीक खान, महादेव आसोलकर यांच्यासह शेकडो अतिक्रमण धारक सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.