आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा योजनेला स्थगिती:अकोल्यातून नागपूरच्या दिशेने निघाली संघर्षयात्रा; उपमुख्यमंत्र्यांना देणार खारे पाणी, शिवसेना आक्रमक

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
खारपाणपट्यातील 69 गावातील पाणी टॅंकररमध्ये जमा; यात्रा 19 एप्रिलला नागपूरला धडकणार  - Divya Marathi
खारपाणपट्यातील 69 गावातील पाणी टॅंकररमध्ये जमा; यात्रा 19 एप्रिलला नागपूरला धडकणार 

बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विराेधात साेमवारी शिवसेनेकडून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला प्रारंभ करण्यात आला. 69 गावातील जमा केलेले खारे पाणी टॅंकरमध्ये भरण्यात आले असून, हा टॅंकर घेऊन शिवसेना, सरपंच, ग्रामस्थ नागपूरकडे निघाले आहेत. हेच खारे पाणी स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याची आणि त्याच पाण्याने आंघोळ करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विधानसभेच्या अकाेला पूर्व व पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेने संघर्षयात्रा काढून थेट फडणवीस यांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

स्थगितीविराेधात संघर्षयात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत याेजनेसाठी आग्रही असलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जि.प. गट नेते गाेपाल दातकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, विकास पागृत, पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा,मुकेश मुरुमकार, उमेश जाधव, तरूण बगेरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अभय खुमकर आदींसह सरपंच आहेत.

भटकंती थांबणार कधी?

219 काेटींच्या या याेजनेवर आतापर्यंत 125 काेटींचा खर्च झाला असून, 92 काेटी रुपये कंत्राटदाराला अदाही करण्यात आले आहेत. 43 कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियाेजन आहे. त्यापैकी 27 कि.मी.अंतरापर्यंत मुख्य जलवािहनी व अंतर्गत 228 पैकी 108 कि.मी. अंंतरापर्यंत जलवािहनी टाकण्यात आली आहे.ग्रामस्थांची पाण्यासाठी हाेत असलेल्या भटकंती काेण थांबवून दिलासा काेण देणार संताप सरपंचांनी व्यक्त केला.

महाआरतीनंतर झाला श्रीगणेशा

  • संघर्ष यात्रेचा श्रीगणेशाला राजेश्वर मंदिरात महाआरती झाल्यानंतर प्रारंभ झाला.संघर्षयात्रा जयहिंद चाैक, महाराणा प्रताप चाैक ,गांधी चाैक, मदनलाल धिंग्रा चाैक, टाॅवर चाैक, रतनलाल प्लाॅट चाैक, जठारपेठ, उमरी, गुडधीमार्गे घुसरकडे रवाना झाली.
  • पहिला मुक्काम अंबिकापूर येथे तर शेवटचा मुक्काम 19 एप्रिल राेजी नागपूर जिल्ह्यातील धामना येथे राहणार आहे.

स्वागतामधून सूचक इशारा

संघर्षयात्रेचे जयहिंद चाैक ते गुडधीपर्यंत आठ ठीकाणी पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यात गांधी चाैक,मध्यवर्ती बसस्थानक, टाॅवर चाैक, लहान व माेठी उमरीचा समावेश हाेता. हा भाग भाजपचे दाेन्ही आमदार गाेवर्धन शर्मा, आमदार तथा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, माजी महापाैर विजय अग्रवाल, अर्चना जयंत मसने यांचा मतदासंघात येताे. स्वागातासाठी परिसरातील तरूण व वयाेवृद्धही हाेते. स्वागतामधून शिवसेनेने भाजपला सूचक राजकीय इशारा दिल्याची चर्चा रंगली आहे.