आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सलग वाढताना दिसत आहे. गुरवार, २३ जून रोजी एकाच दिवसात तब्बल २७ रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून, यातील २३ रुग्ण हे शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील आहेत. या २३ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांना तेथेच विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल अर्थात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये २७ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये दोन महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे. यातील २३ रुग्ण पोलिस प्रशिक्षण केंद्रांतील, दोन अकोला महापालिका क्षेत्रातील तर उर्वरित दोन रुग्ण हे मूर्तिजापूरचे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६५२५२ झाली. दरम्यान, दिवसेंदिवस वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणे अंगावर न काढता तत्काळ वैद्यकीय सल्ल्याने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दिलासा : ४४ पैकी ३४ रुग्ण गृहविलगीकरणात
सद्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या ४४ झाली. मात्र बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे असल्याने त्यांना विलगीकरणातच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ४४ पैकी ३४ रुग्ण हे विलगीकरणात आहेत. तर केवळ १० रुग्ण रुग्णालयात दाखल केले.
सुरक्षात्मक खबरदारीबाबत हयगय राज्यातील विविध भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षात्मक नागरिकांकडून खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर सुरक्षात्मक खबरदारी संदर्भात प्रशासनाचा कोणताही वचक दिसून येत नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यापूर्वी जून, जुलै २०२० मध्ये शहरातील मध्यवर्ती कारागृहातील ५० हून अधिक बंदिवानांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी गर्दी जमते तेथे सुरक्षात्मक खबरदारी घेणे गरजेची आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
कोविड व हंगामी आजाराच्या लक्षणांत साम्य, वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन दरवर्षीच्या पावसाळ्यात जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यातच कोरोनाच्या संसर्गानेही डोके वर काढले आहे. कोविड आणि हंगामी आजार यातील बहुतांश लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणे अंगावर न काढता किंवा परस्पर औषधोपचार न घेता वैद्यकीय सल्ल्याने तपासणी करून घ्यावी व गरजेनुसार कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
१६ दिवसांत २९ रुग्णांनी केली कोविडवर मात
जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णांमध्ये अत्यंत सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. गृहविलगीकरणातूनच अनेक रुग्ण ठणठणीत होत आहेत. आतापर्यंत १६ दिवसात २९ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. यातील तीन रुग्णांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.