आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय?:विवाहितेची जाळून हत्या केल्या प्रकरणी सबळ‎ पुराव्याअभावी पतीची निर्दोष सुटका‎, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल‎

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शारीरिक व मानसिक छळ करून‎ विवाहितेची घासलेट टाकून‎ जाळून हत्या केल्याच्या आरोपातून‎ पतीची निर्दोष सुटका करण्यात‎ आली. हा निकाल जिल्हा व सत्र‎ न्यायाधीश (पहिले) शायना‎ पाटील यांच्या न्यायालयाने दिला.‎

ज्ञानेश्वर पूर्णाजी सिरसाट (वय‎ २८ रा. उगवा ) असे दोषमुक्त‎ केलेल्या आरोपीचे नाव आहे.‎ ज्ञानेश्वर याचा विवाह जयश्री‎ यांच्यासोबत झाला होता. आरोप‎ होता की, पती ज्ञानेश्वर हा‎ माहेरहून पैसे आणण्यासाठी‎ पत्नीला तगादा लावायचा.‎

माहेरहून पैसे न आणल्यामुळे तो‎ पत्नीचा शारिरिक व मानसिक‎ छळ करायचा. त्याच्या त्रासाला‎ कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली‎ होती. मात्र त्याचे वडील पूर्णाजी‎ सिरसाट यांच्यासह सासुरवाडीला‎ जावून त्याने यापुढे चांगले‎ वागवेल, असे हमीपत्र देऊन‎ पत्नीला नांदवण्यासाठी घेऊन‎ आला होता. मात्र, पुन्हा तो‎ पत्नीला त्रास देत होता व २०‎ ऑक्टोबर २००७ रोजी त्याने‎ आईवडिलांच्या मदतीने पत्नीला‎ रॉकेला टाकून पेटवून दिले होते.‎

जखमी अवस्थेत उपचारासाठी‎ पत्नीला रूग्णालयात दाखल‎ करण्यात आले होते. मात्र,‎ उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला‎ होता.‎ यावेळी तहसीलदारांनी तिचे‎ मृत्यूपूर्व बयाण नोंदवले होते. अशा‎ आरोपावरून अकोट फैल पोलिस‎ ठाण्यात पती ज्ञानेश्वर, त्याचे‎ वडिल पूर्णाजी व आईविरूद्ध‎ भादंविचे कलम ४९८ अ, ३२४,‎ ३०४ ब, ३०२ व ३४ नुसार गुन्हे‎ दाखल केले होते. घटनेनंतर‎ ज्ञानेश्वर फरार झाला होता. २०२१‎ मध्ये पोलिसांनी त्याला अटक‎ केली व आजपर्यंत तो‎ कारागृहातच होता.

या प्रकरणी‎ पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर,‎ त्याचे वडील व आईविरूद्ध‎ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल‎ केले होते.‎ दरम्यान खटला सुरु असता‎ ज्ञानेश्वरचे आई-वडिल मरण‎ पावले. त्यानंतर एकट्या‎ ज्ञानेश्वरवर खटला चालला.‎ न्यायालयाने सरकार पक्ष व‎ आरोपी पक्षाची बाजू ऐकून सबळ‎ पुराव्याअभावी आरोपी ज्ञानेश्वर‎ पूर्णाजी सिरसाट याला दोषमुक्त‎ केले. आरोपीच्या वतीने अॅड.‎ चंद्रशील दंदी यांनी काम पाहिले.‎