आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री संत गजानन महाराज यांचे शिष्य श्री संत भास्कर महाराज व संत वासुदेवजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे अकोल्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. 7 जून रोजी अकोट तालुक्यातील श्री क्षेत्र अकोली जहागीर येथून टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत भास्कर महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. सोमवारी, 13 जूनला पालखी अकोला शहरात मुक्कामी होती.
पालखी सोहळ्याचे अध्यक्ष अशोक महाराज जायले व शुभांगीताई जायले यांनी विधीवत पूजन करून पालखीचे प्रस्थान झाले. अकोला जहागीर येथील दिवठाण, अकोट, श्री संत वासुदेवजी महाराज वैष्णवी ज्ञान मंदिर वडाळी सटवाई, वेताळ बुवा मंदिर वारुळा, करोडी मार्गे पालखी 11 तारखेला अकोल्यात पोहोचली. संत गजानन महाराज मंदिर देशमुख फैल, रामदास पेठ, गजानन महाराज मंदिर सहकार नगर येथील मुक्कामानंतर पालखी सोमवारी, 13 जूनला पुढील प्रवासासाठी निघाली. कौलखेड गांधीनगर स्थित शंकरराव कडू यांच्याकडे दुपारी भोजन घेऊन संध्याकाळी पालखी सोहळा मुक्कामाची व्यवस्था माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात होती. मंगळवारनंतर पुढे खोतवाडी, म्हैसपूर, चिखलगाव मार्गे पालखी पातुर नि तेथून पुढील प्रवासाला निघणार आहे.
हा आहे पालखीचा मार्ग
गेल्या दोन वर्षात कोविड संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत होत आहे. वाशीम, हिंगोली, परभणी, औढानागनाथ, परळी, अंबेजोगाई, कळंब, हासेगाव, बार्शी, वडसिंगे, आष्टीमार्गे 5 जुलैरोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. अहिल्याबाई होळकर वाडा महाद्वारासमोर पालखीचा मुक्काम असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.