आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेले वक्तव्य महाराष्ट्र व मराठी माणसांचा अपमान करणारे आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीने अशी विधाने करू नयेत, असे संकेत व परंपरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काळ्या टोपीमधले संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. कोश्यारी यांचे मुंबईविषयीचे वक्तव्य चीड आणणारे आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व महामहिम राष्ट्रपती यांनी कोश्यारी यांना परत बोलवावे,’ अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके यांनी केली.
ते म्हणाले की राज्यपालांची विचारधारा महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विरोधी वक्तव्ये केली. महापुरुषांच्या बाबतही कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्ये केली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही कोश्यारी यांनी बडबड करून महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. आज पुन्हा त्यांनी मुंबईबद्दल बोलून मर्यादांचे उल्लंघन केले. मुंबईच्या जडणघडणीत मराठी माणसाचाच मोठा वाटा आहे पण मराठी माणसांचे योगदान नाकारून राज्यपाल कोश्यारी यांनी नाहक वाद निर्माण केला. कोश्यारी यांचे वक्तव्य मुंबई व मराठी माणसांबद्दलचा त्यांचा द्वेष व्यक्त करणारे आहे.
या वक्तव्याबद्दल राज्यपाल यांनी मुंबई व मराठी माणसांची माफी मागितली पाहिजे. भारतीय जनता पक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू घेत असतो. मुंबई बद्दलचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य भाजपाला मान्य आहे का, याचा त्यांनी खुलासा करावा आणि त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे असे वाटत असेल तर कोश्यारी यांचा भाजपने निषेध करून त्यांना परत पाठवण्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करावी, असेही कपिल ढोके म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.