आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला तालुक्यातील आगर या 7 हजार लोकसंख्येच्या गावात ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. गेल्या 20 दिवसांपासून नळाचे पाणी येत नसल्याने नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सध्या 40 रुपये प्रती टाकीप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते.
जिल्ह्यात पावसाच्या सरींनी दिलासा दिला असला तरी आगर गावातील पाण्याची टंचाई तीव्र बनत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकती वाढली असून, मिळेल तेथून लोक पाणी आणत आहेत. येथील खांबोरा नळ योजनेचे पाणी गेल्या तीन आठवड्यापासून आगरला पोहोचले नाही. खांबोरा नळ योजनेतील शेवटचे गाव म्हणून आगर, नवथळ, खेकडी, परितवाडा, कंचनपूर, पाळोदी, गोत्रा ही गावे समाविष्ट आहेत. येथे पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येतो. दहा दिवसांपूर्वी उगवापर्यंत पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत आहे.
पाइपलाइन जोडणी सुरू
मुख्य पाइपलाइनच्या जोडणीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. उगवा येथे पाणीपुरवठा सुरू असतान मुख्य पाइपलाइनला गळती लागली होती. त्यामुळे आगर व पुढील गावांतील पाणीपुरवठा बंद पडला होता. लवकरच पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन आगरसह उर्वरीत गावांचा पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अभियंता अनिल चव्हाण यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.