आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिरकोळ चढउतार वगळता सोयाबीनचे भाव एकाच जागी स्थिरावल्याने बाजारपेठेतील आवक कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरेदीच्या मुहूर्तापासून भाववाढीची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. मात्र ज्यांना रब्बीच्या पेरणीसाठी पैशांची गरज आहे. किंवा माल साठवणुकीला जागा नाही अशाच शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात विक्री केली आहे.
यंदा २७ ऑक्टोबरपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सरासरी भाव हा सहा हजारांच्या पुढे गेला नाही. ९ नोव्हेंबरला एकदाच जास्तीत जास्त भाव ६१०० मिळाला त्यानंतर भाव स्थिरावले. २४ नोव्हेंबरपर्यंत सरासरी भाव हे साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या जवळपास होते.
त्यानंतर घसरण, किरकोळ चढउतार वगळता भाव स्थिरावले आहेत. गत आठवडाभरातील स्थिती पाहता सरासरी भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये एवढा मिळाला. त्यामुळे निव्वळ गरजेपोटी शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहेत. शनिवार, ३ डिसेंबरला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २ हजार ८८७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. कमीत कमी ४६००, जास्तीत जास्त ५३८५ तर सरासरी ५२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यात अतिवृष्टी, परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले असले, तरी अनेकांना भरपूर उत्पादनही झाले. मात्र सोयाबीनचा उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने सोयाबीन विकावे की ठेवावे याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. सात हजारांवर भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
बीज तंत्रज्ञानासाठी आग्रही
सोयाबीनचे भाव सहा हजारांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. साठ्यावरील मर्यादा, वायदे बाजारावर बंदी, पोल्ट्री उद्योगाचा सततचा दबाव या बाबी दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कारणीभूत आहेत. बाजारपेठा खुल्या करण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी धरला पाहिजे. सोबतच अतिवृष्टी व पाण्याचा ताण सहन करू शकतील, अशा जनुक सुधारित आधुनिक बीज तंत्रज्ञानासाठी आग्रही रहायला हवे.
- डॉ. नीलेश पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना युवा आघाडी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.