आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवाळा मध्यावर आला असतानाही भाज्यांचे दर कमी झाले नव्हते. मात्र या आठवड्यात बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली आहे. परिणामस्वरूप दरही अवाक्यात आले आहे. पालक, मेथी या पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या दरांतही घसरण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत भाजी खरेदीसाठी अधिक पैसे मोजणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे दर उतरले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून कांदा-पात वगळता अन्य पालेभाज्यांच्या दरामध्ये ५० टक्क्यांनी घट झाली आहे. कोथिंबिरीच्या जुडीचा तीन ते पाच, तर मेथीच्या जुडीचा दर सहा ते आठ रुपयांपर्यंत खाली आला आहे. कांदा-पात दरामध्ये तेजी असून यासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने भाज्यांचे दर उतरले असले, तरी कांद्याचे दर मात्र वाढले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो कांद्यासाठी ३० रुपये मोजावे लागताहेत. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, गाजर, भोपळा, दोडके, भेंडी, गवार, हिरवी मिरची आदी भाज्यांचे दर कमी झाले आहेत. भाज्यांची आवक कायम राहिल्यास नजीकच्या काळात भाज्यांचे दर पुन्हा कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.