आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांना बियाणे विक्री व खरेदीसाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या बियाणे महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात विक्रमी १० हजार १७३ हजार क्विंटल बियाण्याची खरेदी व विक्री होऊन तब्बल २९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यासोबतच हा उपक्रम राज्यस्तरावर नेण्यासाठी आपण प्रयत्न करु, असा विश्वास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिला. सोमवारी, ६ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे बियाणे महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
समारोपीय कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, कृषी उपसंचालक संध्या करवा, प्रगतीशील शेतकरी महादेवराव भुईभार, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरूणकर, मंडल कृषी अधिकारी प्रदीप राऊत, आर. एच. राखोडे, कृषी अधीक्षक गजानन महल्ले, रूपेश दिक्षीत, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी असलेल्या बियाणे उत्पादकांचा माल शेतकऱ्यांनी बाजारापेक्षा स्वस्तात खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांची बचत झाली. तर उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ झाली.
हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य विक्री केंद्रासोबतच बियाणे विक्री केंद्र म्हणून नावलौकिक येत आहे. या महोत्सवाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विक्रमी बियाणे खरेदी केली आहे. जिल्ह्यात प्रथमच बियाणे उत्पादक कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्याची विक्री जास्त झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.