आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, आदर्श आचारसंहिता लागू झाली. सर्व संबंधित यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी,’ असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी साेमवारी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी निवडणुकीचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी नीमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे, सहायक पुरवठा अधिकारी संतोष शिंदे आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येत असून, मतदार नोंदणी अंतिम टप्यात सुरू असल्याचे माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.
काेराेनाबाबत उपाय याेजना करा
पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र, वाहन व्यवस्था, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांच्या उपलब्धतेबाबत पूर्व तयारी ठेवावी, असा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला. मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदारांची संख्या वाढवावी. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक ते उपाययोजना राबवावी. घोषित निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी ही सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहितेप्रमाणेच करावयाची असून, त्यात काटेकोर दक्षता पाळावयाची आहे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
अशी आहे संख्या : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, यात ४४ हजार ५०६ जणांचे नाव आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत ४७ हजार मतदारांची नाेंद झाली हाेती. ही संख्या कमी असून, राजकीय पक्ष, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मात्र निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या अर्थात १२ जानेवारीपर्यंतही नाेंदणी करता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.