आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन महिन्यानंतर वर्धेत गुरुवारपासून, उष्णतेची लाट उसळली आहे. दररोज शहर उष्ण होत असून, रविवारी ४४.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. उष्णतेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. रविवार हा बाजाराचा दिवस असूनही, बाजारपेठत व शहरातील रस्त्यांवर सायंकाळपर्यंत शुकशुकाट दिसून आला. उन्हाळ्यात घरा बाहेर पडल्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावीत. बाहेर जाताना चष्मा, छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादीचा वापर करावा. वेळप्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२ ते ३:३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.