आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:"त्या'' दोन मुलींना मिळाले हक्काचे कुटुंब‎

करुणा भांडारकर | अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला येथील गायत्री बालिकाश्रमात‎ राहणाऱ्या दोन मुली येत्या ६ फेब्रुवारी‎ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.‎ लहानपणी कुटुंबापासून दुरावलेल्या‎ मुलींना हक्काचे कुटुंब मिळणार आहे.‎ निताली व मंगला आठ वर्षांपूर्वी‎ बालिकाश्रमात दाखल झाल्या होत्या.‎ निताली अहमदनगर येथे हरवली. तिने‎ अकोला येथे आपले कुटुंब असल्याचे‎ सांगितले. त्यानुसार तिला शहरात‎ आणण्यात आले. प्रशासनाकडून‎ नितालीच्या कुटुंबाचा शोध घेण्यात‎ आला. परंतु पत्ता लागला नाही.

त्यानंतर‎ तिला गायत्री बालिकाश्रमात दाखल‎ केले. येथे तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण‎ केले. सोबतच शिवणकाम, संगणक‎ आदींचे ज्ञान तिला आहे. भटकलेल्या,‎ निराधार मुलींसाठी प्रशासनाकडून‎ ऑपरेशन मुस्कान राबवण्यात येते.

‎याअंतर्गत निराधार मंगला बालिकाश्रमात‎ दाखल झाली. तिनेही आश्रमातच राहून‎ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यापूर्वी‎ आश्रमातील चार मुलींचे लग्न झाले‎ आहे. याच माध्यमातून भुसावळ येथील‎ गाजरे आणि अकोल्याचे पाठक कुटुंब‎ आश्रमाच्या संपर्कात आले. त्यांनी‎ आपल्या मुलांकरिता आश्रमातील‎ मुलींची मागणी घातली. या दोन्ही‎ कुटुंबाची आश्रम संचालक मंडळाकडून‎ संपूर्ण चौकशी करण्यात आली.

यात‎ कुटुंब, मुलाची आर्थिक व समाजिक‎ परिस्थिती आदींची सखोल माहिती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घेण्यात आली. समाधानपूर्वक‎ माहितीनंतर लग्नास होकार देण्यात‎ आला. त्यानुसार ६ फेब्रुवारी रोजी‎ आश्रमात नितालीचा अकोला येथील‎ शुभम शामराव पाठक, तर मंगलाचा‎ भुसावळचे सूरज लिलाधर गांजरे‎ यांच्यासोबत विवाह ठरवण्यात आला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे. दोन्ही मुले खासगी क्षेत्रात कार्यरत‎ आहेत. सध्या आश्रमात दोन्ही लग्नाची‎ तयारी जोमात सुरू आहे.‎

संपूर्ण चौकशीनंतर निश्चिती‎
यापूर्वी आश्रमातील चार मुलींचे लग्न‎ आपण पार पाडले. या सर्व मुली त्यांच्या‎ संसारात रमल्या असून, आनंदी आहेत.‎ यंदा दोन मुलींचे लग्न जुळले. मुलांच्या‎ कुटुंबाकडून लग्नाची मागणी आली.‎ दोन्ही मुलं, त्यांचे कुटुंब याची परिपूर्ण‎ चौकशी व आश्रमातील संचालक‎ मंडळाच्या खात्रीनंतर लग्न समारंभ‎ निश्चित केला.‎ - वैशाली भारसाकळे, अधीक्षिका,‎ गायत्री बालिकाश्रम, मलकापूर.‎

बातम्या आणखी आहेत...