आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेळीचा जल्लाेषाने हसू, अवकाळी पावसाने आसू:फळबागांना फटका; नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन, हवालदिल ​​​​​​शेतकऱ्यांचा पावित्रा

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे हाेळीचा जल्लाेष करताना शहरी भागात नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू दिसून येत आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डाेळ्यात आसू पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तातडीने पंचनामे करून भरीव मदत त्वरित न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने मंगळवारी दिला.

अवकाळी पावसाचा अकाेला, तेल्हारा तालुक्यातील फळबागांना बसला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रचंड पाऊस झाला हाेता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिला. सलग आठ दिवस झालेल्या पावसाने पीक वाया गेले. काही भागात जोरदार पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे आताेनात नुकसान झाले. खरीप हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल अशी आशा असतानाच साेमवारी रात्री व मंगळवारीही अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. परिणामी रब्बी पिकांच्या रुपाने हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेला आहे.

या ठिकाणी बसला फटका

  • हातरूण, नया अंदुरा या भागातील मालवाडा, शिंगाेली, लाेणाग्रा, बाेरगाव, हातला, कंचनपूर याभागात पाऊस झाला.परिणामी साेंगून ठेवलेला हरभरा ओला झाला असून, काही ठिकाणी शेतात हरभरा पिकाचे नुकसान झाले.
  • कवठा बहाद्दुरा, आलेगाव, आगर, लाेहारा या भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणी कांदा व हरभरा काढणीला वेग आला असून अवकाळी पावसामुळे या पिकांची हानीझाली.
  • अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. परिणामी शेतात हरभरा साेंगण्याच्या सुरू असलेल्या कामातही व्यत्यय निर्माण झाला.

वादळी वाऱ्यासह पाऊस

अकाेट व तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस झाला. परिणामी फळबागांचे नुकसान झाले आहे. संत्रा, गहूसह अन्य पिकांची हानी झाली आहे. दरम्यान अस्मानीनंतर आता सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर आले असल्याची टीका शेतकरी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काैठकर यांनी केली.सरकार गहू, कांदासह अन्य शेतमालाचे भाव नियंत्रित करीत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पिक विमा माेबदल्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी मार्च महिन्यात हाेणाऱ्या नुकसानाबाबत शासन निर्णयात उल्लेख नसल्याचे सांगितले. सरकारने मदत न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही काैठकर यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...