आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​वऱ्हाडे निवडणुकीपासून दूर‎:सर्वात मोठ्या बाजार समितीसाठी चुरस;‎ 18 जागांसाठी तब्बल 212 जणांचे अर्ज‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या‎ अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार‎ समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळाची‎ निवडणूक २८ एप्रिल रोजी होत आहे.‎ सोमवार, ३ एप्रिल हा उमेदवारी दाखल‎ करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे‎ संचालक पदासाठी मैदानात उतरलेल्या‎ उमेदवारांची एकूण संख्या २१२ अशी निश्चित‎ झाली आहे. शेवटच्या दिवशी तब्बल १५१‎ जणांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापूर्वी ५३ जणांनी‎ उमेदवारी दाखल केली होती. तर सुरुवातीच्या‎ तीन दिवसांत ८ जणांनी अर्ज भरले होते.‎ सहकार विभागाची ही निवडणूक‎ म्हणायला राजकारणविरहित असली तरी‎ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यातील‎ निवडणुका लक्षात घेता त्यात सर्वच राजकीय‎ पुढारी सहभागी होत आहेत. गेल्यावेळी ७५‎ टक्क्यांहून अधिक ठिकाणी सत्ता राखलेल्या‎ काँग्रेसने यावेळी सर्वच ठिकाणी ‘सहकार‎ पॅनल’ची घोषणा केली असून इतर समविचारी‎ पक्ष-संघटनाही त्यात सहभागी होतील, असे‎ म्हटले आहे. तर खा. नवनीत राणा व‎ बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माजी‎ जि.प. सदस्य काँग्रेसचे प्रकाश साबळे यांना‎ सोबत घेत शेतकरी पॅनलची घोषणा केली‎ आहे.

अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार‎ समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे‎ यांनी यावेळ‌ी स्वत:ला निवडणुकीपासून‎ दूर ठेवले आहे. यापूर्वी त्यांनी सलग पाच‎ वेळा कृउबासची निवडणूक लढून ती‎ जिंकली आहे. त्यामुळे यावेळी स्वत:ला‎ दूर ठेवून इतरांनी नेतृत्व करावे, असे‎ त्यांनी ठरवले आहे. मागील संचालक‎ मंडळापैकी ते एकमेव असे संचालक‎ आहेत, जे निवडणूक रिंगणात नाहीत.‎

२९ एप्रिलला मतमोजणी‎ प्राप्त सर्व २१२ अर्जांची छाननी ५‎ एप्रिलला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ६‎ तारखेला वैध उमेदवारी अर्जांची यादी‎ घोषित केली जाईल. २० एप्रिलपर्यंत‎ निवडणुकीतून माघार घेण्यासाठी मुभा‎ देण्यात आली असून निवडणूक लढू‎ इच्छिणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी‎ २१ एप्रिलला घोषित केली जाईल. त्याच‎ दिवशी निवडणूक चिन्ह वाटप तर २८‎ एप्रिलला मतदान तर दुसऱ्या दिवशी‎ मतमोजणी केली जाणार आहे.‎

अर्ज माघारीपर्यंत ठरवू पॅनल‎ सध्या ही निवडणूक जोर धरत आहे. १८‎ जागांसाठी तब्बल २१२ अर्ज प्राप्त झाल्याने‎ यावेळी चुरस अधिक दिसून येते. तूर्त‎ समविचारी पक्ष, संघटना आणि उमेदवारांसोबत‎ संपर्क सुरू आहे. सहकारात राजकारण नसते,‎ अशी ही निवडणूक आहे. त्यामुळे कोण,‎ कोणासोबत बसेल हे तूर्त सांगता येत नाही.‎ विड्राॅलसाठी पंधरा दिवसांचा वेळ असल्याने‎ अखेरच्या काही दिवसांतच हे चित्र स्पष्ट होईल.‎ - विलास महल्ले, माजी सभापती, कृउबास,‎ अमरावती.‎

भाजपने नेमले समन्वयक‎ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी‎ भाजपने तालुकानिहाय समन्वयक नेमले आहेत.‎ या समन्वयकांनी स्थानिक पातळीवर आघाडी‎ कोणासोबत होऊ शकते, याची चाचपणी केली‎ आहे. जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्यामते या‎ सर्व समन्वयकांची संयुक्त बैठक सोमवारी उशिरा‎ सायंकाळी होत असून त्यातील निर्णयाअंती‎ कोणत्या ठिकाणी कोणासोबत पॅनल गठित‎ करायचे, याचा निर्णय घेतला जाईल.‎